पाठीत कोणी खंजीर खुपसू नये, यासाठी आयुष्यात 'या' पाच गोष्टी लक्षात ठेवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 02:18 PM2022-06-30T14:18:53+5:302022-06-30T14:27:34+5:30

विश्वासघात करणाऱ्या माणसाचा आपल्याला राग येतो, परंतु त्यांच्यावर विश्वास ठेवून विश्वास घात करण्याचा परवाना आपणच पुरवलेला असतो. त्यासाठी सावधगिरी आपणच बाळगायला हवी. त्यासाठी पुढील पाच नियम लक्षात ठेवा!

घरचे आणि बाहेरचे हा फरक असतोच. ज्या घरात आपण जन्माला येतो, वाढतो तिथली नाती अधिक जिव्हाळ्याची असतात. सुख दुःखात सोबत असतात. बाहेर आपण कितीही मुखवटे घेऊन वावरलो तरी घरचे आपल्याला पूर्णपणे ओळखून असतात. ते आपल्याला गुण दोषांसकट स्वीकारतात. म्हणून जेव्हा बाहेरचे आणि घरातले यांच्यापैकी निवड करण्याची वेळ येते तेव्हा निश्चितच घरच्यांची निवड करा!

'फिरते रुपयाभोवती ही दुनिया' ही जगाची रीत आहे. ज्याची सत्ता असते, ज्याच्याकडे मालमत्ता असते, त्यालाच लोक विचारतात. त्याच्याशी नाते जोडू पाहतात. याउलट गरीबाशी कोणी ओळख ठेवत नाही. मैत्री तर फार दूरच! त्यामुळे आपली परिस्थिती ओळखा आणि आपल्या परिस्थीची कोणालाही संधी घेऊ देऊ नका!

रूप चार दिवसांचे पण गुण आयुष्यभर पुरून उरतात, हे पुस्तकी वाटणारे वाक्य वस्तुतः आपल्याला पटत असले, तरी एखाद्या व्यक्तीची पारख आपण त्याच्या राहणीमानाकडे पाहून करतो हीच वस्तुस्थिती आहे. त्यामुळे तुमच्याकडे कितीही चांगले गुण असू द्या, तुमचे व्यक्तिमत्त्व आकर्षक नसेल तर लोक तुमच्याकडे बघणार सुद्धा नाहीत.

ओळख-पाळख नसतानाही एखाद्या श्रीमंत माणसाला आपण पटकन सर, साहेब, शेठ, दादा म्हणतो. पण फाटक्या वेषातल्या माणसाला स्वतः जवळ फिरकूही देत नाही. त्याचे म्हणणे ऐकून घेत नाही. तो कितीही पोट तिडकीने बोलत असला तरी त्याच्या शब्दावर कोणी विश्वास ठेवत नाही. म्हणून मान सन्मान हवा असेल तर गुणांसारखेच पैसेही कमवा. लोक आपोआप तुमची, तुमच्या कलेची आणि पैशांची कदर करू लागतील.

आजवर कोणतेही ऐतिहासिक, पौराणिक, राजकीय संदर्भ घेऊन बघा, तुम्हाला फितुरी, बंडखोरी आढळते. याबरोबरच हेही लक्षात येते, की अशी फितुरी करणारी व्यक्ती बाहेरची नाही तर जवळच्यांपैकीच असते. म्हणून आपले सुख दुःख सांगताना सावध राहा. तुमच्या गोपनीय माहितीचा कोण कधी फायदा घेईल ते सांगता येणार नाही.नंतर विश्वास घात होण्याआधी सावध व्हा!