विमा कंपनीच्या बनवेगिरीला कंटाळले ७२ हजार शेतकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:18 AM2021-07-28T04:18:36+5:302021-07-28T04:18:36+5:30
परभणी जिल्ह्यात दरवर्षी ७ लाख ५० हजार शेतकरी पीक विमा भरून आपली पिके संरक्षित करतात. मात्र, गेल्या दोन वर्षांत ...
परभणी जिल्ह्यात दरवर्षी ७ लाख ५० हजार शेतकरी पीक विमा भरून आपली पिके संरक्षित करतात. मात्र, गेल्या दोन वर्षांत पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांना आलेले कटू अनुभव पाहता शेतकऱ्यांचा पीक विमा काढण्याकडे कल कमी झाला असल्याचे एकंदरीत आकडेवारीवरून दिसते. त्यातच जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठे नुकसान होत आहे. २०२०-२१ या खरीप हंगामात जिल्ह्यातील ७ लाख १२९ शेतकऱ्यांनी ३२ कोटी ९० लाख १४ हजार ३२४ रुपयांच्या पीक विम्याचा हप्ता भरून ३ लाख ७६ हजार ८१ हेक्टरवरील पिके संरक्षित केली होती. मात्र रिलायन्स जनरल इन्शुरन्स विमा कंपनीने शेतकऱ्यांना मदत देताना दुजाभाव केल्याचे दिसून येत आहे. जवळपास संरक्षित केलेल्या सर्वच पिकांचे नुकसान झाले असतानाही या विमा कंपनीने केवळ बोटावर मोजण्याइतकेच शेतकऱ्यांना मदत देऊन ८० कोटी रुपयांचा पीक विमा वाटप केला. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊनही विमा कंपनीकडून मात्र नुकसानभरपाई देताना आखडता हात घेतल्याचे दिसून येत असल्याने दरवर्षी विमा भरणाऱ्या शेतकऱ्याची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. २०२१-२२ या खरीप हंगामातील ६ लाख २७ हजार ४१२ शेतकऱ्याने ३० कोटी ७० लाख ८१ हजार ३६१ रुपयांचा विमा हप्ता कंपनीकडे भरला आहे. ३ लाख ६१ हजार ७२८ हेक्टर क्षेत्रावरील पिके संरक्षित केले आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ७२ हजार ५०० शेतकऱ्यांनी विमा भरण्यासाठी दोन दिवसांची मुदत देऊनही पाठ फिरवली आहे. त्यामुळे पीकविम्याच्या नुकसानभरपाई मिळण्याच्या निकषात किंवा आनुषंगिक तांत्रिक बाबींमध्ये बदल करण्याची अपेक्षा शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहेत.
क्रॉप इन्शुरन्स ॲप चालेना
जिल्ह्यात मागील आठ दिवसांत अतिवृष्टी सह मोठा पाऊस झाला. त्याचबरोबर दुधना, पूर्णा, गोदावरी, करपरा, लेंडी, फाल्गुनी आदी नद्यांना पूर आल्याने या पुराचे पाणी नदीकाठावरील शेतामध्ये घुसले. त्यामुळे कापूस, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे या नुकसानीचे ७२ तासांच्या आत तक्रार नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी विमा कंपनी ने दिलेल्या क्रॉप इन्शुरन्स ॲपवर प्रयत्न केले. मात्र हे ॲप बंद असून विमा कंपनीने नेमलेल्या प्रतिनिधीचे मोबाइल नंबर ही कव्हर क्षेत्राच्या बाहेर असल्याने नुकसानग्रस्त शेतकरी पीकविमा कंपनीबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.