बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 14:45 IST2026-05-04T14:44:11+5:302026-05-04T14:45:13+5:30
बंगालमध्ये या मुद्द्यांवरून धार्मिक धुव्रीकरण झाले होते. टीएमसीने हुमायूं कबीर यांच्या विधानावरून हात झटकत त्यांना पक्षातून निलंबित केले.

बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये भाजपाची त्सुनामी आल्याचं दिसून येत आहे. राज्यातील २९३ जागांपैकी तब्बल १९५ जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. पश्चिम बंगालच्या या निवडणूक निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले होते. त्यात भाजपाने ममता बॅनर्जी यांना जोरदार धक्का दिल्याचे दिसते. या निवडणुकीच्या निकालात आणखी एक मजेशीर ट्रेंड दिसून आला. बंगालमध्ये बाबरी मशीद बांधण्याची घोषणा करून चर्चेत आलेले मुस्लीम नेते हुमायूं कबीर हे २ जागांवर निवडणूक लढवत होते. या दोन्हीही जागांची मतमोजणी सुरू आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
या जागांच्या मतमोजणीत हुमायूं कबीर दोन्ही ठिकाणी आघाडीवर असल्याचे दिसते. हुमायूं कबीर काही महिन्यांपर्यंत टीएमसीचे नेते होते. परंतु निवडणुकीपूर्वी त्यांनी आपला मार्ग वेगळा केला. हुमायूं कबीर यांनी बंगालमध्ये बाबरी मशीद बांधण्याची घोषणा करून राजकारणात खळबळ उडवून दिली. त्यानंतर टीएमसीने त्यांच्यावर कारवाई करत निलंबन केले. हुमायूं कबीर हे भरतपूर येथून आमदार होते. कबीर यांनी बाबरी विध्वंसाच्या दिवशी ६ डिसेंबरला मुर्शिदाबादच्या बेलडांगा येथे बाबरी मशीद बांधण्याची घोषणा केली होती.
११ फेब्रुवारी २०२६ पासून बाबरी मशिदीचे बांधकामही सुरू केले. बंगालमध्ये या मुद्द्यांवरून धार्मिक धुव्रीकरण झाले होते. टीएमसीने हुमायूं कबीर यांच्या विधानावरून हात झटकत त्यांना पक्षातून निलंबित केले. त्यानंतर हुमायूं कबीर यांनी स्वत:चा वेगळा पक्ष स्थापन करत आम जनता उन्नयन पक्ष बनवला. ते रेजीनगर आणि नौदा या जागांवर निवडणूक लढवत होते. या दोन्हीही ठिकाणी हुमायूं कबीर यांनी आघाडी घेतली आहे. हुमायू कबीर यांनी रेजीनगर येथून ३८ हजार मतांनी तर नौदा येथून १६ हजाराहून अधिक मतांनी आघाडी घेतली आहे.
दरम्यान, आम जनता उन्नयन पार्टीचे संस्थापक हुमायू कबीर यांनी निकालावर प्रतिक्रिया देत तृणमूल काँग्रेसला जनतेने नाकारले त्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ममता बॅनर्जी यांनी राज्याला लुटण्याचे काम केले होते. जे झाले ते चांगलेच आहे. असेच व्हायला हवे होते. ममता तीन वेळा मुख्यमंत्री होत्या. त्यांनी आपल्या पुतण्याला ताकद दिली. लोकांना फसवले आणि त्यांचे पैसे लुटले. इंग्रजांनी १००-१५० वर्षांत जेवढे लुटले नाही तेवढे ममता बॅनर्जी यांनी लुटले असा आरोप हुमायूं कबीर यांनी केला.