जनता बॉम्बना मतांच्या माध्यमातून प्रत्युत्तर देईल, राज्यात भाजपचे डबल इंजिन सरकार येईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 09:46 IST2026-04-14T09:45:03+5:302026-04-14T09:46:13+5:30
West Bengal Assembly Election 2026: पश्चिम बंगालची जनता बॉम्बचा प्रतिकार करताना मतांच्या माध्यमातून प्रत्युत्तर देईल, असा दावा करून राज्यात भाजपचे ‘डबल इंजिन’ सरकार स्थापन होईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नमूद केले.

जनता बॉम्बना मतांच्या माध्यमातून प्रत्युत्तर देईल, राज्यात भाजपचे डबल इंजिन सरकार येईल
मयुरेश्वर (पश्चिम बंगाल) - पश्चिम बंगालची जनता बॉम्बचा प्रतिकार करताना मतांच्या माध्यमातून प्रत्युत्तर देईल, असा दावा करून राज्यात भाजपचे ‘डबल इंजिन’ सरकार स्थापन होईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नमूद केले.
बीरभूम जिल्ह्यातील मयुरेश्वर येथील एका जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले की, ‘बंगालच्या जनतेने आता ममता बॅनर्जी सरकारला कायमचा निरोप देण्याचा निर्धार केला आहे.’ ही निवडणूक या राज्यातून तसेच देशातून घुसखोरांची हकालपट्टी करणारी आहे.
सरवना विवेक यांची नियुक्ती
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मोठी नियुक्ती जाहीर केली आहे. ओडिशा कॅडरचे २०१५ च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी सरवना विवेक एम. यांची पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
... घरात राहा, अन्यथा ४ मेनंतर तुरुंगाची हवा दाखवू
आम्ही या राज्यातील शतकानुशतके वास्तव्यास असलेले रहिवासी आहोत. आम्हाला भीती दाखवणाऱ्या तुम्ही कोण, असा प्रश्न करीत अमित शाह यांनी राज्यात विविध ठिकाणी झालेल्या दंगलींचे भाषणात दाखले दिले. मी तृणमूलच्या गुंडांना सांगून ठेवतो, मतदानाच्या दिवशी घरात राहा, अन्यथा ४ मेनंतर तुरुंगाची हवा दाखवू. निवडणूक निष्पक्ष आणि स्वतंत्र व्हावी म्हणून निवडणूक आयोगाने राज्यात केंद्रीय सुरक्षा दलाच्या पुरेशा तुकड्या पाठवल्या आहेत.
राज्य सरकारने बीएसएफला भारत - बांगलादेश सीमेवर तारांचे कुंपण घालण्यासाठी जमीन दिली नाही. भाजप सरकार आल्यास ४५ दिवसांच्या आत जमीन दिली जाईल.
राज्यात भाजप सरकार स्थापन झाल्यावर समान नागरी कायदा लागू केला जाईल. राज्यातील विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर भाजप ‘माफिया राज’ समाप्त करेल.