आर्टिफिशल इंटेलिजन्स, म्हणजेच AI मुळे भारतीय IT उद्योग धोक्यात येईल, अशी चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहे. मात्र, Tata Consultancy Services (TCS) चे मुख्य कार्यकारी अधिकारी के किर्तीवान यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, भारतीय IT क्षेत्र प्रत्येक संकटातून अधिक मजबूतीने बाहेर आले आहे. तसेच, AI हा धोका नसून मोठी संधी आहे.
२०३० पर्यंत IT क्षेत्र संपेल?
‘द इकॉनॉमिक्स टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत कृतिवासन म्हणाले की, २०३० पर्यंत IT सर्व्हिसेस इंडस्ट्री संपेल, असे बोलणे निराधार आहे. AI चा पूर्ण लाभ घेण्यासाठी कंपन्यांना TCS सारख्या IT कंपन्यांची अधिक गरज भासेल. भारतीय IT क्षेत्राची ताकद केवळ कमी खर्च नाही, तर उच्च कौशल्य आणि सखोल तांत्रिक क्षमता आहे.
AI मुळे नवीन संधी निर्माण होतील...
TCS च्या मुख्य संचालन अधिकारी आरती सुब्रमन्यम यांनी सांगितले की AI तंत्रज्ञान वेगाने विकसित होत असले तरी कंपन्यांमध्ये त्याचा वापर अपेक्षेइतका वाढलेला नाही. हा गॅप IT कंपन्यांसाठी मोठी संधी ठरत आहे. क्लाउड आणि प्रगत AI टूल्स पारंपरिक IT सेवांना आव्हान देऊ शकतात. मात्र, TCS त्याकडे नवीन व्यवसाय संधी म्हणून पाहते. त्यांच्या मते, AI मुळे कंपन्यांना जुन्या तंत्रज्ञानातील अडचणी (टेक्नॉलॉजी डेब्ट) कमी करण्याची संधी मिळत आहे, ज्यामुळे व्यवसाय अधिक वेगवान आणि कार्यक्षम होऊ शकतो.
जागतिक अनिश्चिततेतही आत्मविश्वास कायम
पश्चिम आशियातील तणाव आणि जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवरही TCS व्यवस्थापन २०२७ या आर्थिक वर्षाबाबत आशावादी आहे. TCS च्या वार्षिक महसुलात अलीकडे २.४% घट नोंदवली गेली आहे, जी २००४ मधील लिस्टिंगनंतर पहिल्यांदाच घडली आहे. मात्र, कृतिवासन यांनी स्पष्ट केले की, ही घसरण एका मोठ्या प्रोजेक्टच्या समाप्तीमुळे झाली होती. त्यानंतर कंपनीने सलग तीन तिमाहींमध्ये वाढ नोंदवली आहे.
रेकॉर्ड डील्स आणि मजबूत ऑर्डर बुक
TCS ने अलीकडेच आपल्या इतिहासातील सर्वात मोठा टोटल कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू (TCV) नोंदवला आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये TCV ४०.७ अब्ज डॉलर्स होता. तर, चौथ्या तिमाहीत TCV १२ अब्ज डॉलर्स अन् मार्च तिमाहीत ३ मोठे करार करण्यात आले. हे आकडे कंपनीची मजबूत ऑर्डर बुक दर्शवतात.
