ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 08:43 IST2026-04-23T08:42:49+5:302026-04-23T08:43:04+5:30
Uttar Pradesh Accident News: उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर येथे बुधवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात ११ जणांचा जिवंत जळून मृत्यू झाला. वाराणसी-रीवा महामार्गावर नियंत्रण सुटलेल्या एका भरधाव ट्रकने बोलेरो, कार आणि कंटेनरला जोरात धडक दिल्याने हा अपघात झाला.

ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले
उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर येथे बुधवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात ११ जणांचा जिवंत जळून मृत्यू झाला. वाराणसी-रीवा महामार्गावर नियंत्रण सुटलेल्या एका भरधाव ट्रकने बोलेरो, कार आणि कंटेनरला जोरात धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, ज्यामुळे या धडकेनंतर बोलेरोला भीषण आग लागली. ही आग एवढी भयंकर होती की, ज्यामुळे बोलेरोमधून प्रवास करत असलेल्या प्रवाशांना बाहेरही पडता आले नाही. तसेच बोलेरोतील सर्व प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. त्याबरोबरच ऑल्टो कारमधील दोघांचा आणि ट्रकमधील एका व्यक्तीचाही या अपघातात मृत्यू झाला.
याबाब अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक अपर्णा रजत कौशिक यांनी सांगितले की, बुधवारी रात्री एका नियंत्रण सुटलेल्या ट्रकने अनेक वाहनांना धडक दिल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार या ट्रकने एक बोलेरो, एक कार आणि एका कंटेनरला मागून धडक दिली. या धडकेमुळे बोलेरोला आग लागली, तसेच त्यातून प्रवास करत असलेल्या सहा जणांचा जळून मृत्यू झाला. आता या अपघातामागच्या कारणांचा शोध घेतला जात असून, ट्रकचा भरधाव वेग आणि चालकाच्या बेफिकीरीमुळे हा अपघात झाला असावा, असे प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अपघाताची माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान हे अर्ध्या तासानंतर आले. तोपर्यंत अपघातग्रस्त वाहनातील लोक जळत होते. तसेच आगीने भीषण रूप धारण केलेले असल्याने त्यांना वाचवण्यासाठी कुणीही पुढे जाऊ शकत नव्हता.