हसतं घर उद्ध्वस्त! लग्नाआधीच २ सख्ख्या बहिणींसोबत आक्रित घडलं; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 16:03 IST2026-02-22T16:02:20+5:302026-02-22T16:03:35+5:30
राजस्थानच्या जोधपूरमधील सूरसागर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.

हसतं घर उद्ध्वस्त! लग्नाआधीच २ सख्ख्या बहिणींसोबत आक्रित घडलं; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
राजस्थानच्या जोधपूरमधील सूरसागर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मणाई गावात शनिवारी लग्नामुळे असलेलं आनंदाचं वातावरण काही क्षणातच शोकात बदललं. दोन सख्ख्या बहिणींनी लग्नाच्या अवघ्या काही तास आधी विषप्राशन करून आपलं जीवन संपवलं. शोभा आणि विमला अशी या बहिणींची नावं आहेत. पोलीस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, घरात लग्नाचे विधी सुरू होते. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत घरामध्ये कार्यक्रम सुरू होता, ज्यामध्ये नातेवाईक आनंदाने नाचत-गाजत होते. रात्री सुमारे १ च्या सुमारास दोन्ही बहिणी आपल्या खोलीत झोपायला गेल्या. मात्र पहाटे ४ च्या सुमारास अचानक दोघांची प्रकृती बिघडू लागली. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना जोधपूरच्या रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
मुलींच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी पोलिसांना कोणतीही माहिती न देता मृतदेह घरी नेले आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. पहाटे ५ च्या सुमारास मृत मुलींच्या लहान बहिणीने फोन करून ही माहिती तिचे मामा जसवंत सिंह यांना दिली. मामांनी तत्काळ पोलिसांना कळवलें. सकाळी ६ वाजता पोलीस मणाई गावात पोहोचले, तेव्हा तिथे अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण झाली होती.
जसवंत सिंह यांनी गंभीर आरोप केला आहे की, दोन्ही बहिणींचे शरीर निळं पडलं होतं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी महात्मा गांधी रुग्णालयात पाठवले. या घटनेमागे कौटुंबिक वाद असल्याचं समोर येत आहे. मुलींच्या मामाने आरोप केला आहे की, दीप सिंह यांच्या भावांनी मुलींच्या साखरपुड्याबाबत मोठा दबाव निर्माण केला होता.
सुरुवातीला दोन्ही बहिणींचा साखरपुडा भीनमाल येथील पुनासा येथे ठरला होता, पण काही कारणास्तव तो मोडला. त्यानंतर पोकरणच्या जेमला गावात त्यांचा साखरपुडा ठरवण्यात आला. जसवंत सिंह यांचा दावा आहे की, त्यांना त्यांच्या बहिणीला भेटूही दिलं जात नव्हतं. चार दिवसांपूर्वीच बहीण लग्नाची पत्रिका द्यायला आली होती. मामांनी थेट दीप सिंह यांच्या धाकट्या भावावर आपल्या दोन्ही भाचींना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे.
या दोन्ही बहिणी खासगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. एकूण चार बहिणी होत्या, त्यापैकी एका बहिणीचं लग्न आधीच झालं आहे. एडीसीपी पश्चिम रोशन मीणा यांनी सांगितलं की, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.