१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 09:55 IST2026-05-10T09:37:06+5:302026-05-10T09:55:57+5:30
Thalapathy Vijay CM Oath Ceremony: अभिनेते विजय आणि राहुल गांधी यांच्यामधील मैत्रीमुळेच तामिळनाडूमधील सत्तासमीकरण जुळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे

१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
तामिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके आणि मित्रपक्षांचं सरकार सत्तेवर येणार हे आता निश्चित झाले आहे. आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात विजय यांच्यासह इतर नेतेमंडळी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या पण बहुमतापासून अडलेल्या टीव्हीकेला काँग्रेसने पाठिंबा देत घेतलेल्या निर्णायक भूमिकेमुळे सत्तेचं सोपान चढता आलं आहे. यादरम्यान, अभिनेते विजय आणि राहुल गांधी यांच्यामधील मैत्रीमुळेच तामिळनाडूमधील सत्तासमीकरण जुळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
तामिळनाडूमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने इंडिया आघाडीमधील मित्रपक्ष आणि सत्ताधारी डीएमकेसोबत मिळून निवडणूक लढवली होती. मात्र मतमोजणीदरम्यान विजय यांच्या पक्षाला आघाडी मिळून डीएमकेच्या पराभवाची चाहूल लागताच काँग्रेसने टीव्हीकेला पाठिंबा जाहीर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र या सर्वाचं मूळ हे राहुल गांधी आणि विजय यांच्यात १७ वर्षांपूर्वी झालेल्या एका भेटीत असल्याचे आता सांगण्यात येत आहे.
काय घडलं होतं त्या भेटीत
साधारणत: १७ वर्षांपूर्वी केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना राहुल गांधी यांचं नेतृत्व देशपातळीवर आकारास येत होतं. तर अभिनेते विजय हे दक्षिणेतील सुपरस्टार बनण्याच्या दिशेने वाटचाल करत होते. यादरम्यान, एनएसयूआयचे सचिव गोपीनाथ पलानीअप्पन यांच्या माध्यमातून राहुल गांधी आणि विजय यांची एक सिक्रेट भेट झाली होती. यावेळी विजय यांचे वडील एस. ए. चंद्रशेखर हे सुद्धा उपस्थित होते.
या भेटीची आठवण विजय यांनी एकदा सांगितली होती. जेव्हा मला राहुल गांधी यांच्याकडून बोलावणं आलं तेव्हा सुरुवातीला मला वाटलं की, कुणीतरी माझ्यासोबत गंमत करत आहे. राहुल गांधी यांनी भेटावं एवढा मोठा माणूस मी नाही. त्यामुळे माझ्यासाठी हा मोठा क्षण होता. मी चित्रिकरण रद्द केलं आणि माझ्या वडिलांसोबत दिल्लीला गेलो. तिथे राहुल गांधी यांच्या निवासस्थानी आमची भेट झाली. या भेटीनंतर विजय म्हणाले होते की, राहुल गांधी हे देशात बदल घडवून आणण्यासाठी मेहनत घेत आहेत. तसेच त्यांचं विशेष लक्ष हे तरुणांवर आहे. अशा व्यक्तीचं मला भेटणं माझ्यासाठी, माझ्या समर्थकांसाठी आणि तामिळनाडूच्या लोकांसाठी अभिमानाची बाब होती, असे विजय यांनी नंतर सांगितले होते.
राहुल गांधी यांनी दिला होता असा प्रस्ताव
दरम्यान, राहुल गांधी यांनी तेव्हा विजय यांना तामिळनाडू युवक काँग्रेसचा अध्यक्ष बनण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र तेव्हा विजय यांनी केवळ चित्रपटांवर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं. पण दोघांमधील संवाद मात्र सुरूच राहिला. तसेच २०२४ साली झालेल्या टीव्हीकेच्या स्थापनेपासून ते २०२६ विधानसभा निवडणुकीच्या निकालांपर्यंत दोन्ही नेत्यांमधील फोन कॉल आणि शुभेच्छांसाठीचा संवाद कायम राहिला.
तसेच विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर विजय यांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरूनही बहुमतापासून दूर राहणार अशी चिन्हे दिसू लागली तेव्हा काँग्रेसनेच पहिला पाठिंबा जाहीर करून टीव्हीकेला बहुमताच्या उंबरठ्यावर पोहोचवले. त्यानंतर दिल्लीतून सूत्रं हलवून बहुमतासाठीची जुळवाजुळवही करून दिली.