अटारी सीमेवर ‘रिट्रीट सेरेमनी’ची वेळ बदलली; सायंकाळी ६ पासून ‘भारत माता की जय’चा घोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 09:00 IST2026-05-02T08:59:37+5:302026-05-02T09:00:13+5:30
सध्या जे पर्यटक किंवा स्थानिक लोक ही सेरेमनी पाहण्याची योजना करत आहेत, त्यांना नवीन वेळेनुसारच अटारी सीमेवर पोहोचावे लागेल

अटारी सीमेवर ‘रिट्रीट सेरेमनी’ची वेळ बदलली; सायंकाळी ६ पासून ‘भारत माता की जय’चा घोष
अमृतसर - येथील भारत-पाकिस्तान अटारी सीमेवर होणाऱ्या प्रसिद्ध रिट्रीट सेरेमनीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. नवीन निर्णयानुसार, आता रिट्रीट सेरेमनी संध्याकाळी ६ वाजता सुरू होऊन ६:३० पर्यंत चालेल. यापूर्वी साडेपाच ते सहा अशी वेळ होती.
सध्याचे उष्ण हवामान आणि दिवसाच्या कमी-अधिक होणाऱ्या प्रकाशाचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांना अधिक चांगला अनुभव मिळाला तसेच सुरक्षा व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी वेळेत बदल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. १ मेपासून हा नवीन निर्णय लागू करण्यात आला आहे.
‘बिटिंग रिट्रीट’ सोहळा म्हणजे काय?
ब्रिटीशांच्या काळात ही सैन्य परंपरा सुरू झाली. ही परंपरा स्वातंत्र्यानंतरही जपण्यात आली. पूर्वी सूर्यास्ताच्या वेळी युद्ध समाप्ती केली जात असे, युद्ध संपविण्याचा एक प्रघात होता. त्यावेळी युद्धावर गेलेल्या सैन्याने परत यावे यासाठी काही सैन्यदल ही विशिष्ट प्रकारचा बॅण्ड किंवा संगीताची धून वाजवत असे.
याच प्रकाराला कालांतराने एका सोहळ्याचे स्वरुप येत गेले आणि विविध प्रकारच्या धून, बॅण्ड वाजवण्याच्या कार्यक्रमात त्याचे रुपांतर झाले.
हजारो लोक कार्यक्रमात होतात सहभागी
सध्या जे पर्यटक किंवा स्थानिक लोक ही सेरेमनी पाहण्याची योजना करत आहेत, त्यांना नवीन वेळेनुसारच अटारी सीमेवर पोहोचावे लागेल. बीटिंग रिट्रीट सेरेमनी ही भारत आणि पाकिस्तानच्या सैनिकांद्वारे साजरी केली जाणारी एक विशेष परंपरा आहे. यात देशभक्तीची झलक पाहायला मिळते. हजारो लोक या कार्यक्रमाचा भाग बनतात. यावेळी भारत माता की जय तसेच वंदे मातरम यांसारख्या घोषणांनी वातावरण देशभक्तीने दुमदुमून जाते.