"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 10:51 IST2026-05-06T10:48:41+5:302026-05-06T10:51:34+5:30
Rahul Gandhi Attacks on BJP: नुकत्याच चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निकालावर शंका उपस्थित करत विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केंद्र सरकार आणि भाजपावर हल्ला चढवला.

"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
"भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने जागा चोरल्या आहेत", याच विधानाचा पुन्हा उल्लेख करत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि भाजपावर टीका केली. निवडणूक प्रक्रियेबद्दल अनेक शंका उपस्थित करत लोकसभा निवडणुकीतही भाजपाचा प्रत्येक सहावा खासदार हा मतांची चोरी करून जिंकून आणलेला आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला.
विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. लोकसभा निवडणूक आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीचा उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले की, "कधी मतांची चोरी करून जागा चोरल्या जातात, तर कधी पूर्ण सरकारच चोरले जाते. (भाजपाच्या) लोकसभेच्या २४० खासदारांपैकी प्रत्येक सहावा खासदार हा मतांची चोरी करून जिंकलेला आहे. त्यांना ओळखणे कठीण नाहीये, पण त्यांना भाजपाच्या भाषेत घुसखोर म्हणायचे का?", असा सवाल राहुल गांधींनी केला आहे.
भाजपाला १४० जागाही जिंकता येणार नाहीत
राहुल गांधी पुढे म्हणाले, "आणि हरयाणात? तिथे तर पूर्ण सरकारच घुसखोर आहे. जे संस्था आपल्या खिशात ठेवतात. जे मतदार याद्या आणि निवडणूक प्रक्रियाच उलट सुलट करून ठेवतात. ते स्वतःच रिमोट कंट्रोलवर आहेत. त्यांना सत्याची भीती वाटते. कारण निष्पक्ष निवडणुका झाल्या, तर आज ते (भाजपा) १४० जागाही जिंकू शकत नाहीत", अशी टीका राहुल गांधींनी केली.
वोट चोरी से कभी सीटें चुराई जाती हैं, कभी पूरी सरकार।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 6, 2026
लोकसभा के 240 BJP सांसदों में से, मोटे तौर पर हर छठा सांसद वोट चोरी से जीता है। पहचानना मुश्किल नहीं - क्या उन्हें BJP की भाषा में “घुसपैठिए” कहें?
और हरियाणा? वहाँ तो पूरी सरकार ही “घुसपैठिया” है।
जो संस्थाएँ अपनी जेब में…
पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल विरोधकांना शंका
निकाल समोर आल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पहिल्यांदा निवडणूक आयोगावर आरोप केले. भाजपाने १०० जागा चोरल्याचा आरोप ममतांनी केला. त्यानंतर इंडिया आघाडीतील इतर पक्षांच्या नेत्यांकडूनही निकालाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
महाराष्ट्र, हरयाणा, दिल्ली या राज्याच्या निवडणूक निकालाचे हवाले दिले जात आहेत. राहुल गांधींनीही याच मुद्द्यावरुन आता केंद्र सरकार आणि भाजपाला लक्ष्य केले आहे.