अभिषेक बॅनर्जींना मोठा धक्का! घराच्या सुरक्षेत कपात, पोलिसांचा ताफा गायब; शेजारी आनंदात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 20:14 IST2026-05-06T20:08:32+5:302026-05-06T20:14:01+5:30
पश्चिम बंगालमधील निकालानंतर अभिषेक बॅनर्जी यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे.

अभिषेक बॅनर्जींना मोठा धक्का! घराच्या सुरक्षेत कपात, पोलिसांचा ताफा गायब; शेजारी आनंदात
Mamata Banerjee and Abhishek Banerjee: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या ऐतिहासिक निकालांनंतर राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. भाजपने सत्ता काबीज केल्यानंतर, आता तृणमूल काँग्रेसच्या बड्या नेत्यांचे वर्चस्व कमी होताना दिसत आहे. अशातच ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या घराबाहेरील कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मोठी कपात करण्यात आली आहे. याचा आनंद त्यांच्या शेजाऱ्यांना सर्वात जास्त झाला आहे.
अभिषेक बॅनर्जी यांच्या शांती निकेतन या निवासस्थानाबाहेर एरवी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असायचा. मात्र, निवडणुकीचे निकाल समोर येताच ही सुरक्षा व्यवस्था शिथिल करण्यात आली. ४ मे पर्यंत या ठिकाणी ३०० ते ३५० पोलीस कर्मचारी पहारा देत असत पण आता हे सुरक्षा रक्षक हळूहळू तिथून हटवले जात आहेत. इतकेच नव्हे तर घराबाहेर लावण्यात आलेली सुरक्षा यंत्रणाही काढून टाकण्यात आली आहे.
स्थानिक नागरिकांची आनंदी प्रतिक्रिया
अभिषेक बॅनर्जींच्या घराबाहेरील रस्ता सर्वसामान्यांसाठी मोकळा झाल्याने परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. "इतका मोठा बंगला बांधला आहे, पण खासदार असूनही त्यांनी आमच्यासाठी काहीही केले नाही. उलट ते आम्हाला धमकावण्याचे काम करायचे. आधी येथे ३००-३५० पोलीस असायचे, ज्यामुळे आम्हाला रस्त्यावरून चालताना प्रचंड त्रास व्हायचा. आता वातावरण शांत आहे आणि लोक मुक्तपणे फिरू शकतात. हा बदल खूप सकारात्मक आहे," असं स्थानिकांनी सांगितले.
VIDEO | Kolkata: Additional security withdrawn from TMC MP Abhishek Banerjee’s Shantiniketan residence.
— Press Trust of India (@PTI_News) May 6, 2026
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/NCntu8EX1C
राजकीय हिंसाचार आणि निवडणूक आयोगाचे आदेश
एकिकडे सुरक्षेत कपात होत असताना, दुसरीकडे राज्यात निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. आसनसोल येथील तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयाची अज्ञात हल्लेखोरांनी तोडफोड केल्याची घटना घडली. टीएमसीने या हल्ल्याचा आरोप भाजपवर केला आहे. या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने सर्व अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले असून हिंसाचार रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत.
ममता बॅनर्जींचा पराभव आणि भाजपचा उदय
पश्चिम बंगालमधील २९४ जागांपैकी २०७ जागा जिंकून भाजपने ऐतिहासिक बहुमतासह सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. या निवडणुकीत सर्वात मोठा धक्का ममता बॅनर्जी यांना बसला असून, त्या भवानीपूर या आपल्या पारंपरिक मतदारसंघातूनही सुभेंदु अधिकारी यांच्याकडून पराभूत झाल्या आहेत.