Rahul Gandhi: भाजपनं मणिपूर पेटवून दिलं, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा घणाघात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 13:45 IST2026-04-21T13:43:28+5:302026-04-21T13:45:28+5:30
भाजपने देशातील अल्पसंख्याकांना धमकावले, भयभीत केले. मणिपूर पेटवून दिले. परंतु, आपला पक्ष द्वेष पसरू देणार नाही, असे आश्वासन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तामिळनाडूच्या जनतेला दिले.

Rahul Gandhi: भाजपनं मणिपूर पेटवून दिलं, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा घणाघात!
तिरुनेलवेली (तामिळनाडू) : भाजपने देशातील अल्पसंख्याकांना धमकावले, भयभीत केले. मणिपूर पेटवून दिले. परंतु, आपला पक्ष द्वेष पसरू देणार नाही, असे आश्वासन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तामिळनाडूच्या जनतेला दिले.
मी भारत जोडो यात्रा केली आहे. माझे व पक्षाचे ध्येय एकसंध आणि सलोख्याच्या भारताचे आहे, असे ते म्हणाले. अण्णाद्रमुक पक्षात पूर्वी महान नेते होते, ज्यांनी तामिळनाडूच्या संकल्पनेचे रक्षण केले. पण आजचा पक्ष जुना पक्ष राहिलेला नाही. आज तो पोकळ झाला आहे, कारण त्याच्या नेत्यांनी तडजोड केली आहे, असा आरोप त्यांनी केला. भाजप संपूर्ण देशभरात द्वेष, संताप आणि हिंसाचार पसरवत आहे. ते सत्ता मोजक्याच मोठ्या उद्योगपतींच्या हाती एकवटत आहेत. ते एका असमान भारताची निर्मिती करत आहेत. ते अल्पसंख्याक समुदायातील बांधवांना धमकावत आहेत, असा आरोप केला.
अद्रमुकने भाजपसमोर ‘शरणागती पत्करली’
अद्रमुकच्या नेतृत्वाने आपल्या ‘भ्रष्टाचारामुळे’ भाजपसमोर ‘शरणागती पत्करली’ आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी सोमवारी केला. प्रत्येक राज्याचा स्वतःचा आवाज व प्रतिनिधित्व असायला हवे. प्रत्येक राज्यातील लोकांनी आपल्या राज्याचा कारभार स्वतःच चालवला पाहिजे. परंतु, भाजपचा विचार तसा नाही. त्यांचा असा विश्वास आहे की, केवळ एकच परंपरा, एकच भाषा व इतिहास असावा, असेही ते म्हणाले.