आधी दिला इंधन बचतीचा संदेश; आता पीएम मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 08:58 IST2026-05-13T08:56:19+5:302026-05-13T08:58:43+5:30
पंतप्रधान मोदींनी अलिकडेच जागतिक अनिश्चितता, इंधन संकट आणि परकीय चलन साठ्यावर वाढणारा ताण लक्षात घेता देशातील नागरिकांना इंधन बचतीचा संदेश दिला आहे.

आधी दिला इंधन बचतीचा संदेश; आता पीएम मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी केली
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच वाढती जागतिक अनिश्चितता, इंधन संकट आणि परकीय चलन साठ्यावर वाढणारा ताण लक्षात घेता देशातील नागरिकांना इंधन बचतीचा संदेश दिला होता. आता याच पार्श्वभूमीवर त्यांनी स्वतःच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) वापर वाढवण्यासही सांगितले असून, त्यासाठी नवीन वाहने खरेदी करू नयेत, असेही स्पष्ट केले आहे.
SPG कडून अंमलबजावणी सुरू
पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या Special Protection Group (SPG) ने या निर्देशांची अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र, ‘ब्लू बुक’मध्ये नमूद केलेल्या सुरक्षा मानकांमध्ये कोणतीही तडजोड होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
भाजपशासित राज्यांतही अंमलबजावणी
पंतप्रधान मोदी यांच्या या निर्णयाचा प्रभाव आता भाजपशासित राज्यांमध्येही दिसून येत आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्रे रेखा गुप्ता, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही अधिकृत ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
राजकीय वर्तुळात या निर्णयाकडे प्रशासनातील खर्चावर नियंत्रण आणि इंधन बचतीसाठी घेतलेले महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
जागतिक परिस्थितीचा परिणाम
अमेरिका-इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाचा आणि वाढत्या जागतिक कच्च्या तेलाच्या किंमतींचा परिणाम भारतासह अनेक देशांवर होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी रविवारी नागरिकांना “राष्ट्रीय जबाबदारी” लक्षात घेऊन जीवनशैलीत बदल करण्याचे आवाहन केले होते.
सोन्याच्या खरेदीपासून परदेश प्रवासापर्यंत आवाहन
प्रत्येक गोष्टीसाठी आयातीवर अवलंबून राहून देश प्रगती करू शकत नाही, असे सांगत त्यांनी स्थानिक उत्पादनांच्या वापरावर भर दिला. तसेच, नागरिकांना पुढील एक वर्ष अनावश्यक सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहनदेखील केले. परकीय चलन साठ्यावर ताण कमी करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल, असे त्यांनी म्हटले.
तसेच परदेश दौरे, डेस्टिनेशन वेडिंग आणि अनावश्यक विदेशी पर्यटन टाळण्याचाही सल्ला त्यांनी दिला. देशांतर्गत पर्यटन आणि भारतातच समारंभ आयोजित करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या या आवाहनाकडे केवळ सरकारी पातळीवरील निर्णय म्हणून नव्हे, तर देशहितासाठी सामूहिक जबाबदारीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.