होर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेल्या ३६ जहाजांची सुटका करण्यासाठी नौदल सज्ज; युद्धनौका तैनात करण्याच्या तयारीत भारत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 15:49 IST2026-03-10T15:49:05+5:302026-03-10T15:49:22+5:30
नौवहन क्षेत्रातील सूत्रांच्या अंदाजानुसार, या भागात अडकलेल्या एकूण तेल टँकर्स आणि गॅस कॅरिअर्सपैकी सुमारे १० टक्के जहाजे भारतीय आहेत.

होर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेल्या ३६ जहाजांची सुटका करण्यासाठी नौदल सज्ज; युद्धनौका तैनात करण्याच्या तयारीत भारत?
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनी आणि त्याभोवतीच्या सागरी भागात भारताची ३६ हून अधिक जहाजे अडकून पडली आहेत. या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेल्या या जहाजांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी भारत सरकार आता विविध पर्यायांवर विचार करत असल्याचे समजते. यांत एक पर्याय म्हणजे, भारतीय नौदलाच्या युद्धनौकांद्वारे या जहाजांना 'एस्कॉर्ट' (सुरक्षित संरक्षण) देऊन बाहेर काढणे.
भारतीय जहाजे आणि त्यावरील कर्मचारी सुरक्षित -
सरकारच्या माहितीनुसार, सध्या होर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेली सर्व भारतीय जहाजे आणि त्यावरील कर्मचारी सुरक्षित आहेत. त्यांच्याकडे जीवनावश्यक वस्तूंची कोणतीही कमतरता नाही. मात्र, युद्धाच्या भीषण परिस्थितीमुळे या जहाजांना अत्यंत कडक सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करावे लागत आहे. यामध्ये संबंधित प्राधिकरणांसोबत सातत्याने परिस्थितीची माहिती शेअर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
नौदलाची संभाव्य तैनाती -
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी स्पष्ट केले की, पर्शियन आणि ओमानच्या आखातादरम्यान अडकलेल्या या जहाजांना सुरक्षित स्थळी आणण्यासाठी भारत सरकार नौदलाची मदत घेऊ शकते. नौवहन क्षेत्रातील सूत्रांच्या अंदाजानुसार, या भागात अडकलेल्या एकूण तेल टँकर्स आणि गॅस कॅरिअर्सपैकी सुमारे १० टक्के जहाजे भारतीय आहेत.
या व्यापारी जहाजांमध्ये सरकारी मालकीच्या 'शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'च्या जहाजांचाही समावेश आहे. केवळ जहाजेच नव्हे, तर जगभरातील व्यापारी जहाजांवर काम करणाऱ्या भारतीयांची मोठी संख्या लक्षात घेता, या युद्धग्रस्त क्षेत्रात हजारो भारतीय खलाशी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यांच्या सुरक्षित परतीसाठी भारत सरकार आता युद्धपातळीवर हालचाली करत आहे.