नवी दिल्ली : मुंबई, पुण्यासह नऊ शहरांमध्ये या वर्षीच्या जुलै ते सप्टेंबर या काळात घरांच्या विक्रीत २५ टक्क्यांची घट झाली आहे. ग्राहकांचा थंड प्रतिसाद पाहता नव्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये ४५ टक्क्यांची कपात झाली आहे.
प्रॉपटायगर या संस्थेने केलेल्या पाहणीतून हे निष्कर्ष आले आहेत. या काळात नऊ महत्त्वाच्या शहरांमध्ये फक्त ६५,७९९ घरांची विक्री झाली. जुलै ते सप्टेंबरपर्यंत सात महत्त्वाच्या शहरांमध्ये घरांची विक्री घटल्याचा निष्कर्ष अॅनारॉक व जेएलएल या संस्थांनीही काढला होता. अॅनारॉकच्या मते घरविक्रीत१८ टक्के तर जेएलएलच्या मते १ टक्का घट झाली होती.
रिअल इनसाइट या स्थावर मालमत्तेबाबतच्या संस्थेने म्हटले आहे की, नऊ शहरांमध्ये गेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ८८,०७८ घरांची विक्री झाली होती. यंदा मात्र या काळात मोठी घट झाली. गेल्या वर्षी या काळात ६१,६७९ घरबांधणीची नवी कामे सुरू झाली होती. यंदा फक्त ३३,८८३ नवी घरे बांधण्याच्या कामांना प्रारंभ झाला आहे.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे यासह मुंबई महानगर प्रदेश, पुणे, नॉयडा (ग्रेटर नॉयडा, यमुना एक्स्प्रेस-वेसहित प्रदेश समाविष्ट), गुरगाव (भिवाडी,धारुहेरा, सोहनासह), बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, अहमदाबाद या शहरांमधील घरांच्या विक्री व नव्या गृहनिर्माण प्रकल्पांसंदर्भात प्रॉपटायगरने पाहणी केली होती.
स्थिती ‘जैसे थे’च राहील
देशात आर्थिक मंदीसदृश्य वातावरण आहे. बिगरबँकिंग वित्तसंस्था मोठ्या आर्थिक संकटातून जात आहेत. त्यामुळे बिल्डरांना स्थावर मालमत्तेच्या कामांसाठी होणारा पतपुरवठा आटला आहे. सणासुदीचे दिवस असूनही अनेक ग्राहकांनी नवी घरे घेण्याचा विचार पुढे ढकलला आहे. त्यामुळे घरांच्या विक्रीवर परिणाम होत आहे. आगामी तिमाहीमध्येही नवे गृहनिर्माण प्रकल्प सुरू होण्याचे प्रमाण कमीच राहील, असा अंदाज प्रॉपटायगरसह काही संस्थांनी वर्तविला आहे.