पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर, राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात आता राजीनामा सत्र सुरू झाले आहे. महत्वाचे म्हणजे, ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. मात्र, त्यांच्या अत्यंत जवळच्या मानल्या जाणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांनी आणि सल्लागारांनी मंगळवारी आपापल्या पदांचे राजीनामे दिले. यांत, माजी मुख्य सचिव अलापन बंद्योपाध्याय, एच. के. द्विवेदी, मनोज पंत आणि अर्थतज्ज्ञ अभिरूप सरकार यांसारख्या काही महत्वाच्या नावांचा समावेश आहे.
यांच्यासाठी केंद्र सरकारशी भिडल्या होत्या ममता -
या राजीनाम्यांमध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती अलापन बंद्योपाध्याय यांची. मे २०२१ मध्ये आलेल्या 'यास' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक बैठक बोलावली होती. त्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने केंद्र सरकारने त्यांना परत बोलावण्याचा आदेश दिला होता. यासाठी केंद्राने राज्य सरकारला या आयएएस अधिकाऱ्याला कार्यमुक्त करून नॉर्थ ब्लॉकमध्ये हजर राहण्याचे निर्देश द्यावेत असे सांगण्यात आले होते. मात्र, ममता बॅनर्जी सरकारने तसे केले नाही. ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना तो आदेश मागे घेण्याची विनंती केली होती. यानंतर, बंदोपाध्याय सेवेतून निवृत्त झाले असून ते दिल्लीत पदभार स्वीकारणार नाहीत, असे ममतांनी मोदी सरकारला कळवले होते. यावर, त्यांनी (ममता बॅनर्जी) बंदोपाध्याय यांची आपले मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. तत्पूर्वी, त्यांनी राज्य सरकारने दिलेल्या तीन महिन्यांच्या मुदतवाढीचा लाभ घेण्याऐवजी ३१ मे २०२१ रोजी सेवानिवृत्त होण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी त्यांनी आपला राजीनामा मुख्य सचिवांकडे सुपूर्द केला.
आणखी कुणी दिले राजीनामे? -
दरम्यान, अर्थतज्ज्ञ अभिरूप सरकार यांनी ही WBIDC आणि WBSIDC च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, "माझी नियुक्ती एक राजकीय नियुक्ती होती. ममता बॅनर्जी पराभूत झाल्या असल्याने आता पदावर राहण्याचा मला कसलाही नैतिक अधिकार नाही." याशिवाया, एच. के. द्विवेदी आणि मनोज पंत यांनीही आपले राजीनामे दिले आहेत. याच बरोबर, राज्याचे ॲडव्होकेट जनरल किशोर दत्ता यांनीही राज्यपाल आर. एन. रवी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.
बंगालमध्ये २९४ पैकी २०७ जागा जिंकत भाजपने बंगालमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तर टीएमसीला केवळ ८० जागाच मिळाल्या आहेत. एका जागेचा निकाल आणखी लागायचा आहे. यातच, मतमोजणीत घोटाळा झाल्याचा आरोप करत ममता बॅनर्जी यांनी पदावरून हटण्यास नकार दिला आहे.
Web Summary : Following TMC's defeat, key officials, including IAS officer Alapan Bandyopadhyay, resigned. Bandyopadhyay, previously defended by Mamata against Modi, also quit. Other advisors and the Advocate General followed suit, citing ethical grounds or political shifts.
Web Summary : टीएमसी की हार के बाद, आईएएस अधिकारी अलापन बंद्योपाध्याय समेत कई प्रमुख अधिकारियों ने इस्तीफा दिया। बंद्योपाध्याय, जिन्हें ममता ने मोदी के खिलाफ बचाया था, ने भी पद छोड़ा। अन्य सलाहकारों और महाधिवक्ता ने भी नैतिक आधार या राजनीतिक बदलाव का हवाला देते हुए इस्तीफा दे दिया।