रस्त्याच्या कडेला जेवण करणाऱ्या मजुरांना भरधाव कारने चिरडले; दोघांचा मृत्यू, 11 गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 20:47 IST2026-01-18T20:47:11+5:302026-01-18T20:47:31+5:30
अपघातानंतर कारचालक वाहनासह फरार!

रस्त्याच्या कडेला जेवण करणाऱ्या मजुरांना भरधाव कारने चिरडले; दोघांचा मृत्यू, 11 गंभीर जखमी
Jabalpur Accident : एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेला जेवण करणाऱ्या मजुरांना चिरडल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील जबलपूर शहरात घडली आहे. या अपघातात दोन महिला मजुरांचा मृत्यू झाला, तर 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कारचालक वाहनासह फरार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे.
जेवण करतानाच काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व मजूर बरेला हायवेवर ग्रिल पेंटिंगचे काम करत होते. दुपारी साडेएकच्या सुमारास काम आटोपून ते रस्त्याच्या कडेला बसून जेवण करत असताना बरेला येथून जबलपूरकडे येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या, नंबर प्लेट नसलेल्या कारने मजुरांना थेट धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना व रुग्णवाहिकेला माहिती दिली.
दोन महिलांचा जागीच मृत्यू
या अपघातात एकूण 13 मजूर गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी दोन महिला मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. उर्वरित जखमींना तातडीने नेताजी सुभाषचंद्र बोस मेडिकल कॉलेज व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पोलिसांचा तपास सुरू
अतिरिक्त पोलीस अधीक्षक पल्लवी शुक्ला यांनी सांगितले की, सिग्मा कॉलनीसमोर एकता चौकाजवळ 24 हून अधिक मजूर काम करत होते. जेवणाच्या वेळेतच ही दुर्घटना घडली. अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे. बरेला पोलीस ठाण्याचे प्रभारी अनिल पटेल यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे.