देशाच्या सीमेवर आंतरराष्ट्रीय टेरर मॉड्यूलचा विळखा; एका अमेरिकन आणि सहा युक्रेनियन नागरिकांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 14:01 IST2026-03-17T13:55:55+5:302026-03-17T14:01:37+5:30
भारताच्या विरोधात दहशतवादी कट रचल्याच्या आणि म्यानमारमधील बंडखोर गटांना ड्रोन पुरवल्याच्या आरोपावरून एनआयएने ७ परदेशी नागरिकांना अटक केली आहे.

देशाच्या सीमेवर आंतरराष्ट्रीय टेरर मॉड्यूलचा विळखा; एका अमेरिकन आणि सहा युक्रेनियन नागरिकांना अटक
देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारा एक मोठा आंतरराष्ट्रीय कट राष्ट्रीय तपास यंत्रणेने उधळून लावला आहे. भारताच्या विरोधात दहशतवादी कट रचल्याच्या आणि म्यानमारमधील बंडखोर गटांना ड्रोन पुरवल्याच्या आरोपावरून एनआयएने ७ परदेशी नागरिकांना अटक केली आहे. यामध्ये एका अमेरिकन आणि सहा युक्रेनियन नागरिकांचा समावेश असून, त्यांच्यावर 'यूएपीए' अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे.
विमानतळांवरून आवळल्या मुसक्या
मिळालेल्या माहितीनुसार, या कटाचा मुख्य दुवा असलेल्या अमेरिकन नागरिकाला कोलकाता विमानतळावर इमिग्रेशन विभागाने ताब्यात घेतले. त्यानंतर, लखनऊ आणि दिल्ली विमानतळावरून प्रत्येकी तीन युक्रेनियन नागरिकांना अटक करण्यात आली. या सर्वांना शनिवारी दिल्लीतील न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले होते. आता त्यांची कोठडी २७ मार्चपर्यंत वाढवण्यात आली असून, एनआयए त्यांची कसून चौकशी करत आहे.
काय आहे हा खतरनाक कट?
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, हे आरोपी युरोपमधून मोठ्या प्रमाणात ड्रोनची तस्करी करून ते भारतामार्गे म्यानमारमधील सशस्त्र वांशिक गटांना पोहोचवत होते. हे गट भारतातील प्रतिबंधित उग्रवादी संघटनांना शस्त्रे, प्रशिक्षण आणि तांत्रिक मदत पुरवण्याचे काम करत होते. आरोपींनी युरोपमधून आणलेले ड्रोन भारताच्या सुरक्षेसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकले असते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
मिझोराम ठरले 'सेंटर पॉईंट'
हे सातही आरोपी आधी मिझोराममध्ये दाखल झाले होते आणि तिथून त्यांनी म्यानमारमध्ये प्रवेश केला. मिझोरामची ५०० किलोमीटरची सीमा म्यानमारला लागून असल्याने या भागाचा वापर तस्करी आणि प्रशिक्षणासाठी केला गेल्याचा संशय आहे. परदेशी नागरिकांना मिझोराममध्ये जाण्यासाठी विशेष परवानगी लागते, मात्र या आरोपींनी नियमांचे उल्लंघन केल्याचेही तपासात समोर आले आहे.
मोठा खुलासा होण्याची शक्यता
न्यायालयात एनआयएने स्पष्ट केले की, या आरोपींच्या मोबाइल डेटाची तपासणी, सोशल मीडिया अकाऊंटचे तांत्रिक विश्लेषण आणि त्यांच्या फंडिंगच्या स्त्रोतांचा शोध घेणे अत्यंत आवश्यक आहे. या चौकशीतून भारतातील त्यांचे स्थानिक साथीदार कोण आहेत आणि हा 'ड्रोन वॉर'चा प्लॅन नेमका काय होता, याचा मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. सध्या एनआयएने या प्रकरणी अधिकृत भाष्य करणे टाळले असले, तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर मानले जात आहे.