हिमाचलमध्ये हंगामातील पहिली हिमवृष्टी, वैष्णोदेवी यात्रेचा मार्ग बंद; वादळी वाऱ्याचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 14:15 IST2026-01-24T14:14:21+5:302026-01-24T14:15:24+5:30
शिमला-मनालीत नागरिक, पर्यटक व्यावसायिकांमध्ये उत्साह

हिमाचलमध्ये हंगामातील पहिली हिमवृष्टी, वैष्णोदेवी यात्रेचा मार्ग बंद; वादळी वाऱ्याचा परिणाम
शिमला: हिमाचल प्रदेशात शुक्रवारी या हिवाळ्यातील पहिली हिमवृष्टी झाली. यामुळे गेल्या जवळपास तीन महिन्यांपासून असलेला कोरडा काळ संपुष्टात आला असून पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अनेक पर्यटकांनी या नयनरम्य हिमवृष्टीचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले असून, हिमाचलला हिवाळ्यातील नंदनवन (विंटर वंडरलँड) अशी उपमा दिली आहे. प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर पर्यटक बर्फाचा आनंद घेताना दिसत आहेत. 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर काही युजरनी ताज्या हिमवृष्टीचे व्हिडिओ पोस्ट करत पर्यटकांना रस्त्यावरून सावकाश गाडी चालवण्याचा सल्ला दिला आहे.
कुठे किती झाली हिमवृष्टी?
- शिमला हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार: मनाली जवळील कोठी गाव: १५ सेमी (राज्यातील सर्वाधिक).
- लाहौल आणि स्पिती (आदिवासी जिल्हा): गोंधला (१२ सेमी), कुकुमसेरी (६.८ सेमी) आणि हंसा (५ सेमी).
- इतर ठिकाणे: जुब्बल (६ सेमी), मनाली शहर (४.८ सेमी), केलॉन्ग आणि कुफरी (प्रत्येकी ४ सेमी) आणि शिमला शहर (०.६ सेमी).
दिल्लीत सरी, रंगीत तालीमला विलंब
राजधानी दिल्लीत पावसाच्या सरींमुळे शुक्रवारी सकाळी प्रजासत्ताकदिनाच्या रंगीत तालमीस विलंब झाला. ढगांचा गडगडाट आणि हलक्या सरींमुळे तालीम लांबली. ही तालीम पाहण्यासाठी आलेल्या लोकांचीही पावसामुळे त्रेधातिरपीट उडाली.
उत्तराखंडमध्येही दीर्घकाळानंतर बर्फवृष्टी
दीर्घ प्रतीक्षेनंतर शुक्रवारी उत्तराखंडमध्ये अचानक वातावरणात झालेल्या बदलानंतर उंच भागांत बर्फवृष्टी झाली. त्यामुळे दोन-तीन दिवस कमी झालेली थंडी पुन्हा परतली. राजधानी डेहराडूनसह सखल तसेच पठारी प्रदेशांत सकाळपासून हलका पाऊस सुरू होता. पर्यटक या बर्फवृष्टीमुळे सुखावून गेले. अनेक रेस्टॉरंट पर्यटकांनी भरून गेले.
जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टीने सर्व वाहतूक विस्कळीत
सुरेश एस. डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क: जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये अनेक भागांत शुक्रवारी वातावरणात अचानक झालेल्या बदलानंतर बर्फवृष्टी झाली, तर पठारी प्रदेशात पावसाच्या सरी पडल्या. यामुळे रस्ते, रेल्वे तसेच विमान वाहतुकीवर परिणाम झाला. दरम्यान, प्रसिद्ध माता वैष्णोदेवी मार्गावर बर्फवृष्टी होऊन दोन फुटापेक्षा अधिक बर्फ साचल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे. तसेच रामबन, डोडा, किश्तवाड, पूंछ, राजोरी, रियासी, उधमपूर आणि कठुआ जिल्ह्यांत दिवसभर बर्फवृष्टी सुरू होती.