IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाइन्सच्या जखमेवर मीठ, सरकार उचलणार कठोर पाऊल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 09:24 IST2025-12-09T09:22:47+5:302025-12-09T09:24:14+5:30
Civil Aviation Ministry on IndiGo: प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून इंडिगोच्या उड्डाण वेळापत्रकात कपात करण्याचा सरकारचा विचार सुरू आहे.

IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाइन्सच्या जखमेवर मीठ, सरकार उचलणार कठोर पाऊल!
देशातील सर्वात मोठी विमानसेवा असलेल्या इंडिगोच्या मोठ्या प्रमाणात रद्द झालेल्या उड्डाणांमुळे देशभरातील विमानतळांवर हजारो प्रवासी अडकून पडले. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांनी विमानतळावर गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारइंडिगोविरोधात मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून इंडिगोच्या उड्डाण वेळापत्रकात कपात करण्याचा सरकारचा विचार सुरू आहे, असे नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांनी सोमवारी स्पष्ट केले.
मंत्री नायडू म्हणाले की, "इंडिगो सध्या दररोज सुमारे २,२०० उड्डाणे चालवते. परंतु, १ ते ८ डिसेंबरपर्यंत इंडिगोने मोठ्या प्रमाणात उड्डाण रद्द केल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यापुढेही प्रवाशांना अशा समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही म्हणून सरकार इंडिगोच्या उड्डाण वेळापत्रकात कपात करण्याचा सरकार विचार करत आहे. या कालावधीत रद्द केलेल्या ७,३०,६५५ पीएनआरसाठी प्रवाशांना ७४५ कोटी रुपये परत करण्यात आले आहेत. तसेच, एअरलाइनकडे असलेल्या सुमारे ९,००० बॅगांपैकी ६,००० बॅग प्रवाशांना वितरित करण्यात आल्या असून, उर्वरित बॅग मंगळवारपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य आहे", असेही ते म्हणाले.
कारणे दाखवा नोटीसवर इंडिगोचे स्पष्टीकरण
दरम्यान, विमान वाहतूक नियामक संस्था डीजीसीएने एअरलाइनला कारणे दाखवा नोटीस बजावली. यावर इंडिगोने तांत्रिक बिघाड, खराब हवामान आणि नवीन क्रू रोस्टरिंग सिस्टम ही कारणे दिली आहेत. महत्त्वाचे म्हणजे, इंडिगो एअरलाइन्सच्या हिवाळी वेळापत्रकात नेमकी किती कपात केली जाईल आणि डीजीसीएची पुढील कारवाई काय असेल? याकडे आता सर्वसामान्य प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे.
मंत्रालयाची उच्चस्तरीय बैठक
नागरी उड्डाण मंत्रालयाने आज सर्व एअरलाइन ऑपरेटर्सची उच्चस्तरीय आढावा बैठक बोलावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत इंडिगोचे कामकाज कधी आणि कसे सामान्य होईल, इंडिगोला येणाऱ्या अडचणींसारखे भविष्यात होणारे अडथळे टाळण्यासाठी उपाययोजना यावर चर्चा होईल. तसेच प्रवाशांची काळजी आणि परतावा प्रक्रियांचा आढावा घेतला जाईल.