Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 06:48 IST2026-04-22T06:48:14+5:302026-04-22T06:48:59+5:30
नारी शक्ती वंदन दुरुस्ती विधेयकाच्या आडून देशात फूट पाडण्याचा डाव सत्ताधाऱ्यांनी रचला गेला होता. मात्र, तो विरोधी पक्षांनी उधळवून लावला. मुख्यमंत्री विरोधकांचे बुरखे फाडणार म्हणतात. पण, आम्ही हिंदू असून, कोणते बुरखे फाडणार आहात? असा सवाल उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केला.

Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: नारी शक्ती वंदन दुरुस्ती विधेयकाच्या आडून देशात फूट पाडण्याचा डाव सत्ताधाऱ्यांनी रचला गेला होता. मात्र, तो विरोधी पक्षांनी उधळवून लावला. मुख्यमंत्री विरोधकांचे बुरखे फाडणार म्हणतात. पण, आम्ही हिंदू असून, कोणते बुरखे फाडणार आहात? असा सवाल उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केला. अन्यायाला मोडून तोडून टाकणे हा महाराष्ट्र धर्म असून, तोच देशाला व हिंदुत्वाला वाचवू शकतो, असेही ते म्हणाले.
दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भारतीय कामगार सेनेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यावेळी मार्गदर्शन करताना ठाकरे यांनी केंद्र सरकार व राज्याच्या राजकारणावर टीका केली. भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष खा. अरविंद सावंत, सरचिटणीस आ. सचिन अहिर, उपनेते विनोद घोसाळकर, आ. मनोज जामसुतकर, आ. मिलिंद नार्वेकर आदी यावेळी उपस्थित होते. महिला आरक्षणाबद्दल कळवळा असताना संसदेचे उद्घाटनावेळी व अयोध्या राम मंदिरावेळी राष्ट्रपतींना का बोलावले नाही. महिला आरक्षण लागू करा, असे आजही ठामपणे म्हणतो, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रीय म्हणून उभे राहिले पाहिजे
आज काही जण सत्तेसाठी धडपडत असून, सर्व मलाच हवे या हव्यासाने त्यांना पछाडले आहे. नव्या संघटना निर्माण करून युनियन फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण, आमचे नाते कंपनीच्या मालकांशी नव्हे तर गेटवर फडकणाऱ्या भगव्याशी आहे. जिंकण्याची हिंमत नसल्याने निवडणुकीत ईडी, सीबीआयच्या फौजा घुसवत आहेत. सगळे मागे लावून आम्ही जिंकलो म्हणणे असला कारभार महाराष्ट्राने सहन करता कामा नये. महाराष्ट्रावर अन्याय होत असताना बंगालमध्ये बंगाली, तामिळनाडूमध्ये तमिळी उभा राहिला तसेच तुम्हीही महाराष्ट्रीय म्हणून उभे राहिले पाहिजे, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.