VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 13:13 IST2026-04-29T13:08:03+5:302026-04-29T13:13:18+5:30
पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर ईव्हीएमवरील भाजपचं बटणच टेपने झाकल्याचा प्रकार समोर आला आहे.

VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
West Bengal Election 2026: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदानादरम्यान आज दक्षिण २४ परगना जिल्ह्यातील फलता विधानसभा मतदारसंघात मोठा राडा पाहायला मिळाला. ईव्हीएम मशीनवरील भाजपच्या चिन्हासमोरील बटण टेप लावून झाकण्यात आल्याचा खळबळजनक आरोप भाजपने केला आहे. या प्रकारामुळे फलता मतदारसंघात तणावाचे वातावरण असून, केंद्रीय सुरक्षा दलांना जमावावर लाठीमार करावा लागल्याने निवडणुकीला गालबोट लागले आहे. ईव्हीएमवरील भाजपचे बटन टेपने झाकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर काही व्हिडिओ पोस्ट करत तृणमूल काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. मालवीय यांच्या दाव्यानुसार, फलता मतदारसंघातील अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करण्यात आला आहे. भाजपच्या उमेदवाराला मतदान करता येऊ नये, यासाठी कमळ चिन्हासमोरील बटणावर टेप चिकटवून ते लॉक करण्यात आले. बूथ क्र. १४४, १८९, १७७ यामध्ये हा प्रकार घडल्याचे मालवीय म्हणाले.
'डायमंड हार्बर मॉडेल'वरून ममतांवर निशाणा
"ममता बॅनर्जी जहांगीर खानसारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवाराचे समर्थन का करतात, हे यावरून स्पष्ट होते, अशी टीका मालवीय यांनी केली. हा प्रकार म्हणजे अभिषेक बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या डायमंड हार्बर मॉडेलची पुनरावृत्ती असून मतदारांच्या अधिकारावर गदा आणली जात असल्याचा आरोप भाजपने केला. या सर्व बूथवर पुन्हा मतदान घेण्याची मागणीही करण्यात आली आहे.
This is what Mamata Banerjee was defending when she spoke up for Jehangir Khan, a criminal contesting on a TMC ticket from Falta in Diamond Harbour.
— Amit Malviya (@amitmalviya) April 29, 2026
In several polling booths, the option to vote for the BJP has been blocked using a tape, effectively preventing voters from… pic.twitter.com/sKw3mcdA86
सुरक्षा दलांचा लाठीमार आणि तणाव
मतदानादरम्यान फलता येथील बेलसिंघा परिसरात मोठी गर्दी जमा झाली होती. मतदानाच्या १०० मीटरच्या परिसरात जमावबंदी असतानाही लोक तिथून हटण्यास तयार नव्हते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी लाठीमार करत जमावाला पांगवले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी मतदान प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली आहे.
निवडणूक आयोग अॅक्शन मोडमध्ये
ईव्हीएमशी छेडछाड केल्याच्या आरोपांची निवडणूक आयोगाने तातडीने दखल घेतली आहे. जर तक्रारीत तथ्य आढळले, तर संबंधित केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले जातील, असे आयोगाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भाजप उमेदवार देबांशु पांडा यांनी आरोप केला की, त्यांना ईव्हीएमची पाहणी करण्यापासूनही रोखण्यात आले.
सुवेंदु अधिकारींचा इशारा
या प्रकरणावर विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांनीही प्रतिक्रिया दिली. "आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याशीही माझे बोलणे झाले आहे. जर निवडणूक प्रक्रियेत अशाच प्रकारे अडथळे आणले गेले, तर आम्ही जे आवश्यक आहे ते पाऊल उचलू," असा इशारा त्यांनी दिला आहे.