वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 14:45 IST2026-04-29T14:42:41+5:302026-04-29T14:45:30+5:30
Dhananjay Deshmukh News: या निवडणुकीत अश्विनी देशमुख यांना सहानुभूतीच्या फॅक्टरचा फायदा होईल, असा अंदाज होता. हा अंदाज फोल ठरला आणि स्वरुपानंद देशमुख विजयी झाले.

वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
Dhananjay Deshmukh News: सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे रिक्त झालेल्या बीडच्या मस्साजोग येथील सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल समोर आला आहे. सरपंचपदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना पराभव पत्करावा लागला आहे. या निवडणुकीत स्वरुपानंद देशमुख यांनी अश्विनी देशमुख यांना ९२ मतांनी पराभूत केले आहे. पोटनिवडणुकीचा निकाल धक्कादायक मानला जात असून, याबाबत धनंजय देशमुख यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
मागील निवडणुकीत अवघ्या ९ मतांनी पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यंदा मोठ्या फरकाने विजयी झाले. मतमोजणीत पहिल्याच फेरीत आघाडी घेत स्वरूपानंद देशमुख यांनी सर्वांना धक्का दिला होता. दुसऱ्या फेरीत अश्विनी देशमुख यांनी आघाडी मिळवली होती. मात्र निर्णायक ठरलेल्या तिसऱ्या फेरीत मोठी आघाडी घेत स्वरूपानंद देशमुख यांनी विजय निश्चित केला. अखेरीस स्वरूपानंद देशमुख यांनी अश्विनी देशमुख यांचा ९२ मतांनी पराभव करत मस्साजोगचे सरपंचपद पटकावले.
झालेला पराभव, गावकऱ्यांनी दिलेला कौल मान्य करतो
आमचा भाऊ गेल्याने सगळ्यात मोठे नुकसान झाले. त्यामुळे हा पराभव गौण आहे. झालेला पराभव, गावकऱ्यांनी दिलेला कौल मान्य करतो. ज्या काही अफवा पसरवल्या त्या यापुढे पसरवू नयेत ही विनंती. न्यायाची लढाई शेवटी कुटुंबीयांना आणि आम्हाला लढावी लागणार आहे. गावकऱ्यांना सोबत घेऊन आम्ही ती लढू. सीएसआर फंड आणला असा आरोप केला जात आहे, ते पुराव्यानिशी दाखवावे. संतोष अण्णाच्या स्वप्नातले गाव करण्यासाठी प्रयत्न करणार, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या १५ दिवसांपासून मस्साजोगामध्ये सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू होता. या निवडणुकीसाठी स्वरुपानंद देशमुख आणि अश्विनी देशमुख या दोघांनीही आपली ताकद पणाला लावली होती. या निवडणुकीत अश्विनी देशमुख यांना सहानुभूतीच्या फॅक्टरचा फायदा होईल, असा अंदाज होता. मात्र, हा अंदाज फोल ठरला आणि स्वरुपानंद देशमुख विजयी झाले.