भवानीपूरमध्ये निकालाआधीच ड्रामा; स्ट्राँगरूम परिसरात भाजपच्या गाड्या, तृणमूलचा आरोप, स्ट्राँगरूमभोवती राजकीय पहारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 09:10 IST2026-05-04T09:09:23+5:302026-05-04T09:10:18+5:30
ईव्हीएमच्या सुरक्षेवरून संघर्ष व तणाव

भवानीपूरमध्ये निकालाआधीच ड्रामा; स्ट्राँगरूम परिसरात भाजपच्या गाड्या, तृणमूलचा आरोप, स्ट्राँगरूमभोवती राजकीय पहारा
कोलकाता : मतमोजणीच्या एक दिवस आधी रविवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी केंद्रावर रविवारी प्रचंड गोंधळ उडाला. ईव्हीएम ठेवलेल्या परिसरात भाजपचे झेंडे लावलेल्या दोन गाड्यांना प्रवेश दिल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला.
गुरुवारी रात्री सखावत मेमोरियल गर्ल्स स्कूलमधील याच मतमोजणी केंद्रासमोर ममता बॅनर्जी यांनी चार तास धरणे आंदोलन केले होते. तेथेच ही घटना घडली. बॅनर्जी यांनी स्ट्राँगरूममध्ये अनधिकृत लोकांना प्रवेश दिल्याचा आरोप केला होता.
खरातच्या धनादेशांचे बनावट खात्यांशी कनेक्शन; आर्थिक स्रोत लपवण्यासाठी केली जात होती शक्कल
प. बंगालमध्ये मतदान संपल्यानंतर उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरवणारी मतदान यंत्रे (ईव्हीएम) ठेवलेल्या राज्यभरातील स्ट्राँगरूमच्या सुरक्षा व्यवस्थेवर भाजप व तृणमूल काँग्रेस कार्यकर्ते बारीक लक्ष ठेवून आहेत.
भाजपच्या गाड्या आत गेल्या कशा?
ममता बॅनर्जी यांनी मतमोजणीतील अनियमितता आणि ईव्हीएममध्ये फेरफार होण्याची भीती त्यांनी वारंवार व्यक्त केली आहे. मतमोजणी केंद्रापासून १०० मीटर अंतरावर तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते तळ ठोकून आहेत. रविवारी सकाळी भाजपचे झेंडे लावलेल्या दोन गाड्या केंद्राच्या आवारात घुसल्या व थेट स्ट्राँगरूमपर्यंत गेल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला.
‘त्या’ वाहनाचे गूढ काय?
भाजपचे झेंडे लावलेल्या ज्या वाहनांवरून वाद सुरू आहे ते या परिसरातून हटवले जाईल, असे आश्वासन स्ट्राँगरूमच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांनी दिले होते. परंतु, ही वाहने काही वेळे तिथेच उभी होती, असा तृणमूलचा आरोप आहे.
निवडणूक आयोगाने नेमले ४३२ मतमोजणी निरीक्षक
प. बंगालमध्ये आज, सोमवारी होत असलेल्या २९४ मतदारसंघांतील मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ४३२ मतमोजणी निरीक्षकांची नेमणूक केली आहे. राज्यातील संवेदनशील राजकीय स्थिती पाहता अनेक जिल्ह्यांत अतिरिक्त निरीक्षक नेमण्यात आले आहेत.
उत्तर-२४ परगणा जिल्ह्यातील ३३ जागांसाठी ४९ निरीक्षक, तर दक्षिण-२४ परगणा जिल्ह्यातील ३१ जागांसाठी ४५ निरीक्षक तैनात आहेत. मुर्शिदाबादमधील २२ मतदारसंघांसाठी ३३ निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत.
आयोगाने काय स्पष्टीकरण दिले?
भाजपच्या वाहनांबाबत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, हे वाहन हरीश मुखर्जी रोडवरून जात होते. सुरक्षा दले व पोलिसांनी या वाहनाची तपासणी करून काहीही आक्षेपार्ह न आढळल्याने ते जाऊ दिले.
भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार
उत्तर-२४ परगणा जिल्ह्यात शनिवारी रात्री भाजप नेत्याच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ही अटक करण्यात आली आहे.
नुआपाडाचे भाजप उमेदवार अर्जुनसिंह यांनी सोशल मीडियावर दावा केला की शनिवारी रात्री दुचाकीवर आलेल्या गुंडांनी भाजपचे बेरकपूरचे संघटन सचिव कुंदनसिंह यांच्या घरावर गोळीबार केला होता.
'हिंमत असेल तर स्वतः मैदानात उतरा'
फाल्टा विधानसभा मतदारसंघात २१ मे रोजी होणाऱ्या पुनर्मतदानावरून सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने भाजपला आव्हान दिले आहे. २९ एप्रिल रोजी झालेल्या मतदानादरम्यान 'गंभीर निवडणूक गुन्हे' आणि लोकशाही प्रक्रियेचे उल्लंघन झाल्याचे निश्चित करत निवडणूक आयोगाने या मतदारसंघात पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर, तृणमूलने भाजपला त्यांची संपूर्ण ताकद लावण्याचे आव्हान देत जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
'सिंघम' आणा किंवा फौज, विजय आमचाच!
तृणमूल काँग्रेसने सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांना फालटामध्ये प्रचारासाठी आणण्याचे आव्हान दिले आहे.
"तुमची संपूर्ण ताकद पणाला लावा, ५० हजार केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात करा आणि प्रत्येक मतदान केंद्रावर बख्तरबंद गाड्या उभ्या करा, तरीही मतदारांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही, त्यामुळे पराभवासाठी तयार राहा," असा दावा तृणमूलने केला आहे. विशेष म्हणजे, 'सिंघम' म्हणून ओळखले जाणारे पोलीस निरीक्षक अजय पाल शर्मा यांची नियुक्ती आणि निवडणूक आयोगाच्या यंत्रणेवरही तृणमूलने तिखट शब्दांत निशाणा साधला आहे.