Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 11:56 IST2026-05-04T11:51:18+5:302026-05-04T11:56:02+5:30
Assembly Election Results 2026 Marathi: चार राज्यांपैकी तीन राज्यांमध्ये मतदारांनी सत्तांतराला कौल दिला आहे. ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा मोठा धक्का असून, तामिळनाडूतही स्टॅलिन यांच्या पक्षाचा मोठा पराभव झाला आहे.

Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
Election Results 2026 Latest Update: चार राज्ये आणि एका केंद्र शासित प्रदेशांत कोणाची सत्ता असणार, याबद्दलचे चित्र आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. महत्त्वाचे म्हणजे देशाचे लक्ष असलेल्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळमध्ये जनतेने सत्तांतर घडवले आहे. यात पश्चिम बंगालमध्ये भाजपा, तामिळनाडूत विजयच्या केव्हीके आणि केरळात काँग्रेसला जनादेशाचा कौल मिळताना दिसत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, तीन मोठ्या राज्यात सत्तांतर होताना दिसत असून, आसाममध्ये भाजपाने, तर पुद्दुचेरीमध्ये भाजपा आघाडीने पुन्हा सत्ता कायम राखण्यात यश मिळवले आहे. ११.३० पर्यंत झालेल्या मतमोजणीच्या फेऱ्यानंतर निवडणूक आयोगाने आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
पश्चिम बंगालमध्ये अखेर भाजपाचे कमळ फुले
चार राज्यांपैकी सर्वाधिक लक्ष होते पश्चिम बंगालकडे. पश्चिम बंगालची सत्ता मिळवण्यात भाजपाला यश आले आहे. ११.३० पर्यंतच्या मतमोजणीनंतर भाजपाने तब्बल १५६ जागांवर आघाडी घेतली आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.
तृणमूल काँग्रेस ८४ जागांवर आघाडीवर असून, बीजीपीएम, एजेयूपी आणि सीपीआय(एम) यांनी प्रत्येकी एका जागेवर आघाडी घेतलेली आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेसाठी १४७ बहुमताचा आकडा आहे. भाजपाने आतापर्यंत १५६ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे ममतांना सत्तेवरून खाली खेचण्यात भाजपाला यश आल्याचे दिसत आहे.
तामिळनाडूमध्ये टीव्हीकेचा 'विजय'
सगळ्यात जास्त धक्कादायक निकाल तामिळनाडूमध्ये लागताना दिसत आहे. अभियनातून निवृत्ती घेऊन राजकारणात उतरलेल्या विजय यांच्या टीव्हीके पक्षाला जनतेने जनादेश दिल्याचे कलांमधून दिसत आहे. तामिळनाडून बहुमतासाठी ११८ जागा आवश्यक आहेत. टीव्हीकेने ११.३०पर्यंतच्या निकालानुसार १०८ जागांवर आघाडी घेतली आहे.
सत्तेत असलेली द्रमुक तिसऱ्या स्थानी फेकली गेली असून, अवघ्या ४१ जागांवर आघाडीवर आहे. तर अण्णाद्रमुक ६३ जागांवर आघाडीवर आहे. पीएमके ६ जागांवर, काँग्रेस ५ जागांवर आघाडीवर आहे. विजय यांच्या टीव्हीकेने स्टॅलिनच्या यांच्या द्रमुकला सत्तेतून खाली खेचण्यात यश मिळवले असून, हा मोठा धक्का त्यांच्यासाठी आहे.
केरळात डाव्यांचा किल्ला ढासळला
सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवण्यात यशस्वी ठरलेल्या डाव्या लोकशाही आघाडीला यावेळी जनतेने विरोधी बाकांवर बसवले आहे. केरळात काँग्रेसने ५६ जागांवर आघाडी घेतली असून, सीपीआय(एम) पक्ष ३० जागांवर आघाडीवर आहे. आययूएमएल २३ जागा, सीपीआय ११, तर केईसी ७ जागांवर आघाडीवर आहे.
आसाममध्ये काँग्रेसची निराशा
आसाममध्ये सत्तांतर होण्याची अपेक्षा काँग्रेसला होती, पण मतदारांनी पुन्हा भाजपाला संधी दिल्याचे दिसत आहे. बहुमतासाठी ६४ जागा लागणाऱ्या आसाममध्ये भाजपाने ७९ जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस २५ जागांवर आघाडीवर असून, त्यानंतर इतर प्रादेशिक पक्षांचा क्रमांक लागतो. त्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षाचीच भूमिका पार पाडावी लागणार असे दिसत आहे.
दरम्यान, पुद्दुचेरीमध्ये भाजपा आघाडीला पुन्हा कौल मिळाला आहे. भाजपा आघाडी १५ जागांवर पुढे आहे, तर काँग्रेस आघाडी ११ जागांवर पुढे आहे.
तीन राज्ये, तिन्हीचा निकाल वेगळा
पश्चिम बंगालमध्ये डावे आणि काँग्रेस यांची ताकद कमी झाली. त्यामुळे केंद्रात सत्तेत असलेली भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातच खरी राजकीय झुंज झाली. तृणमूल काँग्रेस यावेळीही भाजपाला सत्तेपासून रोखणार का? याकडे लक्ष होते, पण भाजपाने तृणमूलचा विजयाचा वारू रोखल्याचे दिसत आहे.
तामिळनाडूमध्ये विजय यांचा टीव्हीके पक्ष किती प्रभाव पाडू शकेल, याबद्दल सांशकता होती. पण, विजय यांच्या पक्षाला जनतेने थेट सत्तेच्या सिंहासनापर्यंत पोहोचवल्याचे दिसत आहे. टीव्हीकेचा उदय द्रमुक आणि अण्णाद्रमुक यांच्यासाठी भविष्यात अनेक आव्हाने निर्माण करणारा असणार आहे.