नवी दिल्ली - मंगळवारी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. आता या हिंसाचार प्रकरणी आता कायदेशीर कारवाईस सुरुवात झाली आहे. दरम्यान, आज दिल्लीच्या पोलीस आयुक्तांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काही शेतकरी नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे.
दिल्लीचे पोलीस आयुक्त एसएन श्रीवास्तव यांनी काही व्हिडीओ शेअर करत शेतकरी नेत्यांनी प्रक्षोभक विधाने केल्यामुळे आंदोलक भडकले. सतनाम पन्नू यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणांमुळे शेतकरी भडकले. असे सांगत श्रीवास्तव यांनी शेतकरी नेत्यांनी केलेल्या काही प्रक्षोभक व्हिडीओ शेअर केले. राकेश टिकेत यांच्यासोबत असलेल्या शेतकऱ्यांनीही हिंसाचार केल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, २५ जानेवारीला शेतकरी नेत्यांनी दिलेला शब्द मोडला. २६ जानेवारी रोजी सकाळीच आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडण्यास सुरुवात केली. आंदोलकांना रोखण्यासाठी आमच्यासमोर अनेक पर्याय होते. मात्र आम्ही संयमाचा मार्ग पत्करला. आम्हाला जीवितहानी टाळायची होती. त्यामुळे आम्ही अश्रुधुराचा मारा केला, असे श्रीवास्तव यांनी सांगितले.
दिल्ली पोलीस आयुक्तांनी लाल किल्ला परिसरात झालेल्या हिंसाचाराला आम्ही गांभीर्याने घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले. लाल किल्ल्यावर हिंसाचार करणाऱ्यांचे व्हिडीओ आमच्याकडे आहेत. त्यांची ओळख पटवली जात आहे. त्यांनाअटक करून पुढील कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.