"सरकारचा हुकूमशाही कारभार, २०१४पासून 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवणारा..."; काँग्रेसचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 19:26 IST2026-03-12T19:25:25+5:302026-03-12T19:26:53+5:30
Congress vs BJP: भाजपा खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करत असल्याचाही आरोप

"सरकारचा हुकूमशाही कारभार, २०१४पासून 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवणारा..."; काँग्रेसचा हल्लाबोल
Congress vs BJP: भारतात २०१४ पासून एक ५६ इंचाच्या छातीचा व्यक्ती 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवून सत्तेवर आला; पण विकासाचे दाखवलेले स्वप्न फुसका बार ठरला. भाजपा खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करत आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार हुकूमशाही पद्धतीने राज्यकारभार करत आहे. ही हुकूमशाही संपुष्टात आणली पाहिजे. सरकार हे लोकशाही व संविधानानुसार चालले पाहिजे, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
"आज लोकशाही व संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. भाजपाच्या सत्ता, संपत्ती व अहंकाराच्या बुलडोझरसमोर काँग्रेसचा कार्यकर्ता निर्धाराने लढला. सरकारी यंत्रणा व पैशाचा वारेमाप वापर करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपा लढला. इंग्रजांविरोधात स्वातंत्र्यसैनिक लढले, त्याच त्वेषाने काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता लढला. जे यश मिळाले, ते वाखण्याजोगे आहे. हा लढा असाच पुढे सुरु ठेवायचा आहे. तसे केले तरच पक्षाला गतवैभव प्राप्त होईल," असा विश्वास सपकाळ यांनी व्यक्त केला.
"देशात दोन विचारांची लढाई सुरु आहे, संविधानवादी व मनुवादी असा हा संघर्ष असून भाजपाला संविधान मान्य नाही. १९८९ पासून भाजापाने धर्मांधतेचे राजकारण सुरु केले आहे पण मनुवादाविरोधातील हा लढा हजारो वर्षापासूनचा आहे. काँग्रेसचा विचार हा सर्वसामान्य जनतेला अधिकार व हक्क देणारा आहे. तोच विचार लोकशाही व संविधानात आहे. संविधानाने सर्वांना हक्क व अधिकार दिले आणि भाजपाचा विचार हा नेमका याविरोधातला आहे. भाजपा संविधानावर आक्रमण का करत आहे हे यातून समजून घ्या", असे विचार सचिन सावंत यांनी मांडले.
उद्या शुक्रवारी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या शिबिराचा सांगता समारोह होणार आहे. त्यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यशाळेचा दुसरा दिवस असून सायंकाळी समारोप होणार आहे.