कमाल! पुस्तकी शिक्षणाला 'फिल्मी' तडका; ४० लाख मुलांचं आयुष्य बदललं, कोण आहे 'हा' हिरो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 13:50 IST2026-03-18T13:50:17+5:302026-03-18T13:50:59+5:30
जर तुमच्याकडे समाज बदलण्याचा ठाम निर्धार आणि जिद्द असेल, तर तुम्ही लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवू शकता हे त्यांनी सिद्ध केलं आहे.

फोटो - zeenews
खरं शिक्षण केवळ पुस्तकी नसतं, तर ते आयुष्यातील चढ-उतार आणि अनुभवातून मिळतं असं म्हणतात. हीच गोष्ट सय्यद सुलतान अहमद यांनी सिद्ध करून दाखवली आहे. आपल्या करिअरची सुरुवात केमिकल इंजिनीअर म्हणून करणाऱ्या अहमद यांची गणना आज भारताच्या सर्वात मोठ्या शिक्षण तज्ज्ञांमध्ये केली जाते. जर तुमच्याकडे समाज बदलण्याचा ठाम निर्धार आणि जिद्द असेल, तर तुम्ही लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवू शकता हे त्यांनी सिद्ध केलं आहे. त्यांनी पाठांतराच्या जुन्या पद्धतींना बाजूला सारून शिक्षण आनंदी आणि अर्थपूर्ण बनवलं आहे.
जेव्हा सुलतान अहमद स्वतः विद्यार्थी होते, तेव्हा त्यांना शिक्षण पद्धतीत एक मोठी उणीव जाणवली. त्यांच्या लक्षात आलं की, भारतीय शाळांमध्ये मुलांना पाठांतर करण्यात हुशार बनवलं जातं, पण जेव्हा प्रत्यक्ष आयुष्यातील आव्हानं, भावना समजून घेणं आणि जीवन कौशल्य यांचा प्रश्न येतो, तेव्हा मुलं मागे पडतात. शाळांमध्ये 'काय' विचार करायचा हे शिकवलं जातं, पण 'कसा' विचार करायचा हे कोणीच शिकवत नाही. हीच दरी भरून काढण्यासाठी त्यांच्या मनात एक नवीन कल्पना आली. त्यांना अशी शिक्षण प्रणाली हवी होती जी कथा आणि भावनांच्या माध्यमातून मुलांचं वर्तन आणि चारित्र्य घडवू शकेल.
आपले हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सुलतान यांनी 'एलएक्सएल आयडियाज' (LXL Ideas) नावाची संस्था स्थापन केली आणि 'स्कूल सिनेमा' नावाचा एक अनोखा उपक्रम सुरू केला. चित्रपट आणि कथांना शालेय शिक्षणाचा भाग बनवणं हा यामागचा मुख्य उद्देश होता. या माध्यमातून मुलांचे नेतृत्व गुण, इतरांबद्दलची संवेदनशीलता आणि सामाजिक समज यांसारखे कठीण विषय अतिशय सोप्या आणि रंजक पद्धतीने शिकवले जातात. आज ही मोहीम भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचली असून ४० लाखांहून अधिक मुलं याचा लाभ घेत आहेत. अनेक नामांकित शाळांनी तर त्यांच्या रोजच्या वेळापत्रकात याचा समावेश केला आहे.
सुलतान अहमद हे केवळ एक उद्योजक नाहीत, तर ते एक दूरदर्शी चित्रपट निर्माते देखील आहेत. मुलांची मानसिकता ओळखून त्यांनी त्यांच्यासाठी १५० हून अधिक शॉर्ट फिल्मस तयार केल्या आहेत. त्यांच्या या कार्याची दखल केवळ जनतेनेच घेतली नाही, तर भारत सरकारनेही त्यांचा गौरव केला आहे. त्यांना आतापर्यंत ७ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी बनवलेले चित्रपट जगभरातील ५७५ हून अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित झाले आहेत. उत्तम कथा कोणत्याही भाषेच्या किंवा देशाच्या मर्यादेत अडकत नाहीत आणि त्या शिक्षणाचे उत्तम माध्यम ठरू शकतात, याचेच हे जिवंत उदाहरण आहे.
सध्या सुलतान अहमद हे 'TAISI' (The Association of International Schools of India) चे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. येथे ते भारतीय शाळांना आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक सक्षम बनवण्याचे काम करत आहेत. 'SCIFF' सारख्या फिल्म फेस्टिव्हलच्या माध्यमातून त्यांनी मुलांना जगाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन दिला आहे. शिक्षण पूर्णपणे अनुभव आणि सर्जनशीलतेवर आधारित असावे, हे त्यांचे पुढील ध्येय स्पष्ट आहे. येणारी पिढी केवळ परीक्षेतील गुणांच्या मागे न धावता, आयुष्यातील प्रत्येक लहान-मोठ्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज असावी, अशी त्यांची इच्छा आहे. जेव्हा शिक्षण हे ओझं न राहता एक आनंददायी प्रवास बनेल, तेव्हा आपोआपच एक चांगला माणूस म्हणून घडेल असं त्यांचं ठाम मत आहे.