भाजपाचे नेते प्रवेश वर्मा यांनी एका पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत त्यांना 'दिल्लीचा रहमान डकैत' असं म्हटलं. ज्याप्रमाणे 'धुरंधर' चित्रपटाचा सिक्वेल आला, त्याचप्रमाणे केजरीवाल यांनी आता दिल्लीच्या लोधी इस्टेटमध्ये स्वतःसाठी 'शीशमहल-२' तयार केला आहे, असा गंभीर आरोप वर्मा यांनी केला.
प्रवेश वर्मा म्हणाले की, जो व्यक्ती एकेकाळी सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे राहण्याचा आणि साधेपणाचा दावा करायचा, तो आज दिल्लीतील सर्वात महागड्या आणि आलिशान भागांपैकी एक असलेल्या ९४-९५ लोधी इस्टेटमध्ये शिफ्ट झाला आहे. त्यांनी सवाल केला की, "आम आदमी पार्टीचं नाव आता 'आलिशान आदमी पार्टी' असायला हवं. केजरीवाल यांनी सांगावं की या नव्या बंगल्यात किती पैसा गुंतवण्यात आला आहे आणि हा पैसा नेमका कोणाचा आहे?"
पंजाब आणि दिल्लीची तुलना
भाजपा नेत्याने असा दावा केला की, जेव्हा दिल्लीच्या मतदारांनी 'रहमान डकैत'ला नाकारलं, तेव्हा ते पंजाबला गेले, जिथे त्यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या अडचणी वाढवल्या. पंजाबमधील मुख्यमंत्री निवासाच्या आसपासच्या चार मोठ्या सरकारी बंगल्यांवर केजरीवाल आणि त्यांच्या जवळच्या नेत्यांचा (सत्येंद्र जैन, संजय सिंह आणि मनीष सिसोदिया) ताबा असल्याचा आरोप त्यांनी केला. वर्मा यांच्या मते, केजरीवाल यांनी पंजाबमध्येही एक 'शीशमहल' बांधला आणि आता दिल्लीत पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती करत आहेत.
"प्रामाणिक कार्यकर्ते पक्ष सोडून गेले नसते"
प्रवेश वर्मा पुढे म्हणाले की, जेव्हा दिल्ली कोरोनाच्या लाटेचा सामना करत होती आणि लोक औषधांअभावी मरत होते, तेव्हा केजरीवाल यांच्या आदेशानुसार त्यांच्या जुन्या 'शीशमहल'चं काम एक दिवसही थांबलं नव्हतं. नव्या घराचा लेआउट दाखवत ते म्हणाले की, जर केजरीवाल यांनी खोल्यांच्या सजावटीवर खर्च केलेल्या बुद्धीचा थोडासा भाग दिल्लीच्या समस्या सोडवण्यासाठी वापरला असता, तर आज त्यांचे प्रामाणिक कार्यकर्ते पक्ष सोडून गेले नसते.
"दिल्लीच्या जनतेची फसवणूक केली”
भाजपाने असा आरोप केला आहे की केजरीवाल यांनी दिल्लीच्या जनतेची फसवणूक केली आहे. एकीकडे दिल्लीतील मूलभूत सुविधा कोलमडत असताना, दुसरीकडे आम आदमी पार्टीचे प्रमुख एकामागून एक आलिशान बंगले बदलत आहेत. दरम्यान, या आरोपांवर आम आदमी पार्टीकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, परंतु दिल्लीत पुन्हा एकदा 'बंगला राजकारण' शिगेला पोहोचलं आहे.
Web Summary : BJP alleges Kejriwal built a luxurious 'Sheesh Mahal 2' using public funds while Delhi suffered. They accuse him of extravagance and deceiving the public with lavish residences in Delhi and Punjab. AAP is yet to respond.
Web Summary : भाजपा का आरोप है कि केजरीवाल ने दिल्ली में जनता के पैसे से आलीशान 'शीश महल 2' बनवाया। उन्होंने केजरीवाल पर दिल्ली और पंजाब में भव्य आवासों के साथ फिजूलखर्ची और जनता को धोखा देने का आरोप लगाया है। आप की प्रतिक्रिया आनी बाकी है।