नवी दिल्ली - काँग्रेसला (Congress) पुडुचेरीमध्ये मोठा धक्का बसला आहे. पुडुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात अपयश आलं. त्यानंतर पुडुचेरीतील सरकार कोसळलं. पुडुचेरी विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री नारायणसामी बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याची घोषणा केली. त्यानंतर मुख्यमंत्री नारायणसामी यांनी उपराज्यपालांना आपला राजीनामा सोपवला. रविवारी दोन आमदारांनी आपला राजीनामा दिल्यानंतर पडुचेरीमध्ये राजकारण तापलं होतं. याच दरम्यान भाजपाने काँग्रेसचे नेते राहुल गांधींवर (Rahul Gandhi) जोरदार हल्लाबोल केला आहे.
भाजपाचे नेते आणि आयटी सेलचे राष्ट्रीय प्रमुख असणाऱ्या अमित मालवीय (Amit Malviya) यांनी काँग्रेसला बहुमत सिद्ध न करता आल्यानंतर सणसणीत टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. सध्या राहुल गांधी हे पुडुचेरीच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे राहुल यांच्या पायगुणामुळेच काँग्रेसचं सरकार पडल्याचं म्हणत मालवीय यांनी निशाणा साधला आहे. "राहुल गांधी पुद्दुचेरीला गेले आणि त्यांनी त्यांच्या मिडास टचमुळे या केंद्रशासित प्रदेशामधील काँग्रेसचं सरकार पाडलं" असं मालवीय यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
पुडुचेरीत काँग्रेसचं सरकार कोसळलं; नारायणसामींनी मोदी, हिंदी, बेदींवर साधला निशाणा
पुडुचेरीचे मुख्यमंत्री नारायणसामी यांनी आपल्या समर्थक आमदारांसह विधानसभेतून वॉकआऊट केलं. त्यानंतर उपराज्यपालांची भेट घेत त्यांनी आपला राजीनामा सोपवला. "आम्ही द्रमुक आणि अपक्ष आमदारांच्या मदतीनं सरकार स्थापन केलं. त्यानंतर आम्ही अनेक समस्यांचा सामनाही केला. आम्ही अन्य निवडणुकाही जिंकल्या. पुडुचेरीची जनता आमच्यावर विश्वास ठेवून आहे ये यातून स्पष्ट होतं," असं ते यापूर्वी म्हणाले.
त्यांनी बोलताना पुडुचेरीच्या माजी राज्यपाल किरण बेदी यांच्यावरही निशाणा साधला. "किरण बेदी आणि केंद्र सरकारनं सरकार पाडण्याचे प्रयत्न केले. जसे आमचे सर्व आमदार एकत्र आले आम्ही पाच वर्ष पूर्ण करण्यात यशस्वी झालो. केंद्र सरकारनं पडुचेरीच्या नागरिकांचा विश्वासघात केला आहे," असंही ते म्हणाले. "तामिळनाडू आणि पुडुचेरीमध्ये आम्ही दोन भाषा प्रणालीचं पालन करतो. परंतु भाजपनं जबरदस्ती हिंदी लागू करण्याचा प्रयत्न केला. आमदारांनी आपल्या पक्षाच्याप्रती प्रामाणिक राहिलं पाहिजे. राजीनामा देणारे आमदार लोकांचा सामना करू शकणार नाहीत. लोकं त्यांना संधीसाधू असं म्हणतील," असंही त्यांनी नमूद केलं.