१२० दिवसांनंतर सौदीतून लेकाचा मृतदेह आला, पण आई-बापाने पाठ फिरवली; नेमकं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 13:28 IST2026-02-16T13:20:58+5:302026-02-16T13:28:26+5:30
सौदी अरेबियातील जेद्दा येथे कामाला गेलेल्या विजय कुमार महतो यांचा मृत्यू होऊन तब्बल १२० दिवस उलटले आहेत.

१२० दिवसांनंतर सौदीतून लेकाचा मृतदेह आला, पण आई-बापाने पाठ फिरवली; नेमकं कारण काय?
नियतीचा खेळ किती क्रूर असतो, याचा प्रत्यय सध्या झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यात येत आहे. सौदी अरेबियातील जेद्दा येथे कामाला गेलेल्या विजय कुमार महतो यांचा मृत्यू होऊन तब्बल १२० दिवस उलटले आहेत. शनिवारी त्यांचा मृतदेह मोठ्या प्रयत्नाने भारतात आणण्यात आला, पण पोटच्या गोळ्याचा मृतदेह स्वीकारण्यास हतबल कुटुंबाने नकार दिला आहे. "जोपर्यंत मुलांच्या भविष्यासाठी कंपनीकडून लेखी आश्वासनाची पत्रावळ मिळत नाही, तोपर्यंत आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही," अशी आर्त हाक या कुटुंबाने दिली आहे.
नेमकं काय घडलं होतं?
मूळचे गिरिडीहचे असलेले विजय कुमार महतो जेद्दा येथे एका ट्रान्समिशन लाईन प्रोजेक्टवर काम करत होते. ऑक्टोबर २०२५ मध्ये एका टोळीयुद्धात आणि पोलिसांच्या चकमकीत विजय दुर्दैवाने क्रॉसफायरमध्ये अडकले. गोळी लागल्याने गंभीर जखमी झालेल्या विजय यांचा १५ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. तेव्हापासून त्यांचा मृतदेह सौदीतच अडकला होता.
१२० दिवसांचा वनवास आणि आता नकार का?
विजय यांचा मृतदेह मुंबईमार्गे रांची विमानतळावर पोहोचला आणि तिथून तो रिम्स रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. मात्र, त्यांचे मेहुणे राम प्रसाद महतो आणि इतर कुटुंबीयांनी मृतदेह घेण्यास स्पष्ट नकार दिला. कुटुंबाचे म्हणणे आहे की, "आम्ही विजयवर खूप प्रेम करतो, पण त्याच्या मागे त्याची पत्नी, ५ आणि ३ वर्षांची दोन लहान मुले आणि वृद्ध आई-वडील आहेत. त्यांच्या पोटाचा प्रश्न आणि मुलांच्या शिक्षणाचं काय? कंपनी नुकसानभरपाईबाबत काहीही स्पष्ट बोलत नाहीये."
सरकारची ५ लाखांची मदत, पण...
झारखंड सरकारने मृत विजय यांच्या कुटुंबाला तातडीने ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र, ज्या कंपनीत विजय कामाला होते, त्या कंपनीने आपली जबाबदारी झटकू नये, अशी कुटुंबाची मागणी आहे. कंपनीने लेखी स्वरूपात नुकसानभरपाईचे आश्वासन दिल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्यावर कुटुंब ठाम आहे.
प्रशासन काय म्हणते?
झारखंडच्या मायग्रंट कंट्रोल सेलच्या प्रमुख शिखा लाकडा यांनी सांगितले की, "हे प्रकरण सध्या सौदी अरेबियातील न्यायालयात सुरू आहे. अंतिम नुकसानभरपाई कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असेल. आमचा विभाग दूतावासाच्या माध्यमातून सतत संपर्कात आहे, परंतु विदेशी कंपन्यांच्या बाबतीत राज्याच्या अधिकारांना मर्यादा आहेत."
एकीकडे लाडक्या माणसाचा चेहरा शेवटचा पाहण्याची ओढ आणि दुसरीकडे भविष्यातील अंधार, अशा कात्रीत हे कुटुंब अडकले आहे. ५ वर्षांच्या चिमुरड्याला आपला बाबा कायमचा सोडून गेलाय हे अजून कळलेही नाही, पण त्याच्या भविष्यासाठी आई-वडिलांनी आपल्या काळजावर दगड ठेवून हा टोकाचा निर्णय घेतला आहे.