एअर इंडियाच्या ४ हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 10:50 IST2026-03-16T10:50:02+5:302026-03-16T10:50:25+5:30
मागील आर्थिक वर्षांत या कर्मचाऱ्यांनी ईएलटी धोरणाचे उल्लंघन केले. मात्र, यामुळे किती आर्थिक नुकसान झाले व नेमका कालावधी यासंदर्भातील माहिती उघड करण्यात आलेली नाही.

एअर इंडियाच्या ४ हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई, कारण काय?
नवी दिल्ली : एअर इंडिया या विमान कंपनीने नियोजित रजा प्रवास धोरणाचा (ईएलटी) गैरवापर करणाऱ्या तब्बल ४ हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. या कर्मचाऱ्यांकडून दंड आकारण्यासह सुधारणात्मक कारवाई सुरू केल्याचा दावा रविवारी सूत्रांकडून करण्यात आला.
टाटा समूहाने जानेवारी २०२२ मध्ये तोट्यात चालणारी एअर इंडिया विकत घेतली. या विमान कंपनीकडून सध्या एक महत्त्वाकांक्षी परिवर्तन योजना राबवण्यात येणार आहे. एअर इंडियामध्ये एकूण २४,००० हून अधिक कर्मचारी आहेत. एअर इंडियाच्या ईएलटीत मोठ्या प्रमाणात विसंगती आढळल्याचे चौकशीतून स्पष्ट झाल्यानंतर ही कारवाई सुरू केली आहे. ईएलटीअंतर्गत विमान कंपनीचे कर्मचारी व त्यांच्या जवळच्या नातेवाइकांना विशिष्ट संख्येत मोफत विमान तिकिटे दिली जातात.
कर्मचाऱ्यांनी चढ्या भावाने तिकिटे विकली
काही कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी कोणताही संबंध नसलेल्या लोकांना नातेवाईक दाखवून या धोरणाचा गौरवापर केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. काही कर्मचाऱ्यांनी तर मोफत तिकिटे मिळवली व बाहेरच्या लोकांना ती चढ्या भावाने विकली. अशा प्रकारे ईएलटी धोरणाचा गैरवापर करणारे ४ हजारांहून अधिक कर्मचारी असल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले आहे.
मागील आर्थिक वर्षांत या कर्मचाऱ्यांनी ईएलटी धोरणाचे उल्लंघन केले. मात्र, यामुळे किती आर्थिक नुकसान झाले व नेमका कालावधी यासंदर्भातील माहिती उघड करण्यात आलेली नाही.