जगण्यासाठी संघर्ष! खिशात पैसे नाहीत, आजारी पत्नीसाठी वृद्धाचा ३०० किमीचा प्रवास, पाणावतील डोळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 09:52 IST2026-01-24T09:51:53+5:302026-01-24T09:52:40+5:30
७५ वर्षांच्या बाबू लोहार यांनी हार न मानता आपल्या पत्नीला साध्या मालवाहू रिक्षावर बसवलं आणि ३०० किलोमीटरचे अंतर कापण्याचा धाडसी निर्णय घेतला.

फोटो - ndtv.in
पत्नी आजारी, पॅरालिसिसमुळे चालता-फिरता येत नाही, अशा परिस्थितीत डॉक्टरांना दाखवणं गरजेचं होतं. पण उपचारासाठी नेण्याइतपत खिशात पैसे नव्हते. अशा वेळी ७५ वर्षांच्या बाबू लोहार यांनी हार न मानता आपल्या पत्नीला साध्या मालवाहू रिक्षावर बसवलं आणि ३०० किलोमीटरचे अंतर कापण्याचा धाडसी निर्णय घेतला. ओडिशाच्या रस्त्यांवर प्रेम, हतबलता आणि जिद्दीची डोळे पाणावणारी घटना पाहायला मिळाली.
बिहारच्या दशरथ मांझी यांनी वेळेवर उपचार न मिळाल्याने पत्नी गमावली होती, त्यानंतर त्यांनी डोंगर पोखरून रस्ता तयार करत प्रेमाचा एक वेगळाच आदर्श निर्माण केला होता. आता ओडिशाच्या ७५ वर्षीय बाबू लोहार यांनी आपल्या ७० वर्षांच्या पत्नीची जीव वाचवण्यासाठी रिक्षावरून ३०० किलोमीटरचा प्रवास करून 'प्रेमाची' नवी व्याख्या सांगितली आहे.
बाबू लोहार हे संबलपूरच्या गोल बाजार क्षेत्रातील मोदीपाडा येथील रहिवासी आहेत. अनेक वर्षांपूर्वी त्यांचा ज्योती यांच्याशी विवाह झाला होता. ७० वर्षीय ज्योती लोहार यांना पॅरालिसिसचा झटका आला. बाबू लोहार यांनी त्यांना संबलपूरच्या रुग्णालयात दाखवलं, तेव्हा डॉक्टरांनी अधिक चांगल्या उपचारांसाठी कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला.
बाबू लोहार यांच्यासमोर एक नाही तर अनेक अडचणी होत्या. खिशात पैसे नव्हते, आधार देणारं कोणी नव्हतं आणि उतारवयामुळे शरीरात ताकदही कमी होती. पण पत्नीवरील प्रेम आणि जिद्दीने त्यांना हिंमत दिली. आपल्या पॅरालिसिस झालेल्या पत्नीला त्यांनी सामानाची ने-आण करणाऱ्या रिक्षावर झोपवलं आणि कटकच्या दिशेने ३०० किलोमीटरच्या प्रवासाला सुरुवात केली.
७५ वर्षांचे बाबू लोहार स्वतः रिक्षा ओढत संबलपूरहून कटकला पोहोचले. तिथे त्यांनी पत्नीवर उपचार केले आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र वाटेत एक अपघात झाला. चौद्वारजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांच्या रिक्षाला धडक दिली, ज्यात त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. त्यांना तातडीने तंगी आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार झाल्यानंतर, या वृद्ध पतीने पुन्हा पत्नीला रिक्षावर बसवले आणि संबलपूरचा प्रवास सुरू केला
बाबू लोहार जाताना भावूक होऊन म्हणाले, "आमचं कोणीही नाही, आम्ही दोघेच एकमेकांचे आहोत." त्यांनी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचे वारंवार आभार मानले आणि त्यांना आशीर्वाद दिले. "रुग्णालयातील विकास सरांनी आम्हाला खूप मदत केली. त्यांच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत. त्यांनी आम्हाला आर्थिक मदतही केली" असंही म्हटलं आहे.