५० कोटी भाविक, हजारो कोटींचा महसूल; अयोध्या श्रीराम मंदिर जगात नंबर १ चे तीर्थक्षेत्र होणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 18:45 IST2026-02-20T18:45:09+5:302026-02-20T18:45:39+5:30
Ram Mandir Ayodhya: अयोध्या केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

५० कोटी भाविक, हजारो कोटींचा महसूल; अयोध्या श्रीराम मंदिर जगात नंबर १ चे तीर्थक्षेत्र होणार!
Ram Mandir Ayodhya: संपूर्ण राम मंदिर तयार झाले आहे. राम मंदिर परिसरात अनेक मंदिरे बांधण्यात आली असून, त्याचेही लोकार्पण झाले आहे. अयोध्येतील राम मंदिराला आता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतासह जगभरातून कोट्यवधि भाविक रामचरणी नतमस्तक झाले. अयोध्येत येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यातच पुढील काही काळात प्रतिवर्षी सुमारे ५५० कोटी भाविक अयोध्येत येऊन रामललाचे दर्शन घेतील, असा कयास बांधण्यात आला आहे.
एका आयआयएमच्या अहवालानुसार, राम मंदिराचे लोकार्पण झाल्यानंतर देशभरात १ लाख कोटींची उलाढाल झाल्याचे म्हटले आहे. राम मंदिराच्या लोकार्पणानंतर अयोध्येच्या अर्थव्यवस्थेत ऐतिहासिक परिवर्तन झाले आहे. आयआयएम लखनऊच्या एका केस स्टडीतून असे दिसून आले आहे की, राम मंदिर बांधण्यापूर्वी अयोध्येची ओळख प्रामुख्याने एका पवित्र तीर्थस्थळापुरती मर्यादित होती. परंतु, लोकार्पण झाल्यानंतर येथील आर्थिक घडामोडींमध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे.
अयोध्या श्रीराम मंदिर जगात नंबर १ चे तीर्थक्षेत्र होणार
श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिर बांधण्याच्या निर्णयानंतर, जागतिक आध्यात्मिक शहर म्हणून विकसित करण्याच्या संकल्पाने अयोध्याला मक्का आणि व्हॅटिकनसारख्या केंद्रांपेक्षा पुढे ठेवले आहे. अयोध्या केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. असा अंदाज आहे की भविष्यात, दरवर्षी सरासरी ४५ ते ५० कोटी भाविक येथे भेट देतील. अयोध्येने मक्का आणि व्हॅटिकनला मागे टाकले आहे. सर्वात मोठे ख्रिश्चन तीर्थक्षेत्र असलेल्या व्हॅटिकनला दरवर्षी अंदाजे ०.९ कोटी पर्यटक भेट देतात. सर्वात मोठे मुस्लिम तीर्थक्षेत्र असलेल्या मक्काला अंदाजे २ कोटी पर्यटक येतात. अहवालात असे म्हटले आहे की, भविष्यात अयोध्येला हजारो कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होऊ शकतो.
दरम्यान, राम मंदिराच्या लोकार्पणामुळे देशभरात ₹१ लाख कोटींहून अधिक व्यवसायिक उलाढाल झाली, ज्यामध्ये अयोध्येने महत्त्वाची भूमिका बजावली. दररोज येणाऱ्या २००,००० हून अधिक भाविकांच्या गर्दीमुळे हॉटेल आणि संबंधित उद्योगांना चालना मिळाली आहे. पर्यटन, गुंतवणूक, रोजगार आणि महसुलात लक्षणीय वाढ झाली आहे. आदरातिथ्य, बांधकाम, वाहतूक आणि सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी झपाट्याने वाढल्या आहेत. पुढील ४ ते ५ वर्षांत पर्यटन, वाहतूक आणि आतिथ्य क्षेत्रात अंदाजे १.२ लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होण्याचा अंदाज आहे.