बिहारमधील कॉपीविरोधी मोहिमेत ३०० गजाआड

By Admin | Updated: March 21, 2015 23:58 IST2015-03-21T23:58:19+5:302015-03-21T23:58:19+5:30

खुद्द मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शालांत परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट झाल्याची कबुली देताना यामुळे राज्याच्या प्रतिमेची हानी झाल्याचे म्हटले आहे.

300 anti-graft campaign in Bihar | बिहारमधील कॉपीविरोधी मोहिमेत ३०० गजाआड

बिहारमधील कॉपीविरोधी मोहिमेत ३०० गजाआड

पाटणा : बिहारमधील कॉपीविरोधी मोहिमेत शनिवारपर्यंत ३०० जणांना अटक करण्यात आली आहे. खुद्द मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शालांत परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट झाल्याची कबुली देताना यामुळे राज्याच्या प्रतिमेची हानी झाल्याचे म्हटले आहे.
‘परीक्षा मे कदाचार के कारण जगहसाई हुई हैं... हमने कदाचार रोकने के लिये कारवाई के आदेश दिये है, (परीक्षेत प्रचंड प्रमाणात कॉपी झाल्याच्या वृृत्तांमुळे बिहारची सगळीकडे नाचक्की झाली आहे. मी कॉपी रोखण्यासाठी कारवाईचे आदेश दिले आहेत.) असे नितीशकुमार यांनी पत्रकारांना सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या कॉपीमुक्त शालांत परीक्षेच्या आदेशाचा परिणाम आज दिसून आला.
पोलिसांनी परीक्षा केंद्राबाहेरून कॉप्या पुरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३०० जणांना अटक केली होती. अतिरिक्त पोलीस महासंचालक (मुख्यालय) गुप्तेश्वर पांडे म्हणाले की, एकट्या वैशाली जिल्ह्यात १५० जणांना अटक करण्यात आली असून त्यात परीक्षार्थींचे पालक आणि नातेवाईकांचा समावेश आहे. शालांत परीक्षेत गैरमार्गाचा अवलंब करण्यात सर्वात पुढे अशी वैशाली जिल्ह्याची कुख्याती झाली आहे. आपल्या मुलाला कॉपी पुरविण्यासाठी पालक तीन व चार मजली इमारत चढत असल्याचे गाजलेले छायाचित्र याच जिल्ह्यातील आहे. (वृत्तसंस्था)

४झाशी : बिहार शालांत परीक्षेतील सामूहिक कॉपीवरून वाद निर्माण झाला असतानाच परीक्षेत गैरप्रकार न करू दिल्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्याने प्राध्यापकाला मारहाण केल्याची घटना झाशी येथे घडली. विशेष म्हणजे आरोपी हा एका विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आहे.
४स्थानिक बिपीन बिहारी कॉलेजचा बी. एस्सी.चा विद्यार्थी असलेल्या राहुलने कॉपी न करू दिल्यामुळे प्राध्यापकास मारहाण केली. १७ मार्च रोजी झालेल्या या मारहाणीत राहुलचे काही साथीदारही सहभागी होते. पोलिसांनी राहुलला अटक केली असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.

अहवाल मागवणार
४पाटणा : बिहारमध्ये शालांत परीक्षेत मोठ्या प्रमाणात सामूहिक कॉपी झाल्याच्या वृत्ताबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय राज्य सरकारकडे अहवाल मागविणार असल्याचे या खात्याचे राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांनी शनिवारी सांगितले. केंद्र या मुद्यावर राज्याकडून अहवाल मागून राज्याला कॉपीमुक्त करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे सुचवेल, असे ते म्हणाले.

Web Title: 300 anti-graft campaign in Bihar