ओझर : येथे गेल्या महिन्यात नगर परिषदेची उद्घोषणा झाल्यानंतर झालेल्या ओझर ग्रामपालिकेवर यतीन कदम यांच्या नागरिक आघाडीचे १६ उमेदवार निवडून आले आहेत.
प्रभाग पाचमधून जयश्री धर्मेंद्र जाधव या निवडून आल्या आहेत. याच प्रभागातून माजी सरपंच हेमराज जाधव यांचा अवघ्या तीन मतांनी पराभव झाला. गेल्या महिन्यात ओझर नगर परिषदेची उद्घोषणा झाल्यामुळे सुरुवातीला कोर्टबाजी करूनदेखील निवडणूक आयोगाने ठाम राहिल्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीवर बहिष्कार टाकून माघार घेतली होती. त्यामुळे नागरिक आघाडीच्या १० जागा बिनविरोध आल्या.
उरलेल्या सात जागांवर झालेल्या निवडणुकीत बहुजन समाज पार्टीचे धर्मेंद्र जाधव यांच्या कार्याची पावती त्यांना मिळाली. यतीन कदम यांनी दुसऱ्यांदा सत्ता कायम राखली आहे. येणाऱ्या काही दिवसांत नगर परिषदेचे रूपांतर कसे वळण घेते, यावर सत्तेचा काळ ठरणार आहे.