चला, एकूण जे झाले ते उत्तमच झाले. नाशिककरांचे भाग्य अचानक उजळून निघाले. ऋषि-मुनी आणि साधू-संत यांनी, त्यांच्या तपसामर्थ्याने दिलेल्या शापाचे उ:शापात रुपांतर झाले.‘कुंभ होणार नाही, होऊ दिला जाणार नाही’, या शापवाणीचा उच्चार कानी पडताक्षणी सारी जनस्थाननगरी भयकंपित होऊन उठली. धरणी दुभंगून गेली, (कोण म्हणते रे की धरणी शापवाणीने नव्हे, नगरपालिकेतील शापितांच्या करतुकीमुळे दुभंगली?) धरणी तर धरणी, पण आकाशही भयभीत झाले. या भयाचे अश्रुधारांमध्ये रुपांतर झाले आणि या धारांचा संततधार वर्षाव होऊ लागला! संततधारेने धरती शांत आणि सौम्य झाली, पण तिने ‘आपणासारखे करिती तत्काळ’ या संतवचनाचा आश्रय घेऊनच की काय, साधू-संतांच्या क्रोधाग्नीचेही बहुधा शीततम जलात रुपांतर केले. गेला तो काळ, जेव्हां साधू-संत आणि ऋषी-मुनी, स्वमग्नावस्थेत एकांतात दरीकंदरी ज्ञानोपासना करीत असत. समाजाशी, समाजातील घडामोडींशी, समाजातील सण-वार आणि व्रतवैकल्ये यांच्याशी त्यांचा दुरान्वयानेही संबंध येत नसे वा ते तसा येऊही देत नसत. पण आता तसे राहिलेले नाही. साधू-संतांनाही या मृत्युलोकातील घडामोडींमध्ये कमालीचे स्वारस्य निर्माण झाले आहे. समाजाने आपला एक पाट सात ठिकाणी करावा, अशी आसक्ती त्यांच्या ठायी निर्माण झाली आहे. मान-अपमानाच्या जाणीवा आणि अपेक्षा यांनी तर केव्हांच त्यांच्यात शिरकाव करुन घेतला आहे. कालमानानुसार आता या साऱ्या कल्पना आणि त्यांच्या पाठोपाठ येणाऱ्या अपेक्षांनी त्यांच्यातील तामस गुण अधिकाधिक तप्त होत चालला आहे. त्याचाच परिणाम म्हणून मग ती शापवाणी, ‘कुंभ होऊ देणार नाही’!पण व्यवहारात असं म्हणतात की, एकाने आग झाले तर दुसऱ्याने पाणी व्हावेच लागते. परमकृपाळु भगवंताच्या दयेने प्रशासनाने पाणी होणे पत्करले. साधू-संतांसाठी पायघड्या घातल्या. त्यांच्या एकूणच शरीर प्रकृतीला मानवेल, झेपेल आणि रुचेल असा त्यांचा पाहुणचार केला. या सेवेमुळे की काय, क्रोधाग्नी आणखीनच शांत झाला. पाणी होणे फळाला आले. उदईक प्रात:काळी गंगापूजनाचा मुहूर्त निश्चित झाला.गंगेकाठी समस्त साधूजन आणि ब्रह्मवृंद ब्राह्म मुहुर्तावर सज्ज झाले. गोरस, पुष्प-पत्री आणि गंधाक्षदांनी गोदेचे विधिवत पूजन केले गेले. गोरस प्रवाहित करण्याने आणि फुलं आणि पत्री जलार्पण करण्याने गोदा अधिकच प्रदूषित तर होणार नाही ना, अशी शंका काही पाखंडी लोकानी व्यक्त केली. पण तसे कसे होईल? साधूत्वाचा स्पर्श झालेल्या जिनसांनी असे थोडेच काही होत असते?साधू-संत उल्हसित तर प्रशासनासह अवघी नगरी उल्हसित. तसेच झाले. कुंभमेळ्याच्या घार्मिकतेला प्रारंभ झाला. गोदेचे पूजन करुन तिला नैवेद्य दाखविला गेला. कुंभाच्या मार्गातील साऱ्या विघ्नांचे हरण झाले, या समाधानात साऱ्या महानुभावांनी परतीचा मार्ग पत्करला.बिचारी गोदामाय मात्र विचारात पडली, अरे; कुणीही उठतो आणि येताजाता माझी पूजा का करतो बबड्यांनो? मी काय तुमच्या पूजेची भुकेली आणि पूजा करणाऱ्यांसारखी आसुसलेली आहे? या विचारात गुंग असतानाच, तिला खुदकन हसूही आले. रामकुंडाने भुवया उंचावून कारण विचारले. हसू दाबत माय म्हणाली, ‘हेच विघ्नकरते आणि हेच स्वयंघोषित विघ्नहर्ते. हसू नको तर काय करु’? (विशेष प्रतिनिधी)
अवघे नगरजन आनंदे चिंब नहाले। विघ्नकर्तेच विघ्नहर्ते की हो जाहले।।
By admin | Updated: August 2, 2014 01:22 IST
अवघे नगरजन आनंदे चिंब नहाले। विघ्नकर्तेच विघ्नहर्ते की हो जाहले।।
अवघे नगरजन आनंदे चिंब नहाले। विघ्नकर्तेच विघ्नहर्ते की हो जाहले।।
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}