लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील जामदोईपाड्यात रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास विलायती कौल व लाकडाच्या दोन घरांना आग लागली. या घटनेत दोन्ही घरे खाक झाले असून घरातील संसारोपयोगी साहित्यासह चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. दोन्ही कुटुंबातील सदस्य शेतात मजुरीसाठी व महूची फुले वेचणीला गेले होते. सोबत गुरेही नेल्याने ते नुकसानीपासून वाचले.मोलगीच्या जामदोईपाडा येथील सोन्या रेहमा पाडवी व गोवा रेहमा पाडवी या दोन्ही भावांच्या विलायती कौल व लाकडाच्या घरांना आग लागली. या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्यासह चांदीचे दागिने, एक लाख ६० हजार रुपये रोख, तांदूळ, दादर, मका, तूर, दाळी, मोरबंटी यासह सागवानी लाकूड व पाट्या असे साडेचार ते पाच लाखाचे नुकसान झाले. दोन्ही कुटुंबातील सदस्य गुरांना घेऊन शेतात कामासाठी व महूफुले वेचण्यासाठी गेल्याने नुकसान टळले. घरी कोणीच नसल्याने आग कशी लागली त्याचे कारणही समजू शकले नाही. या आगीत घरे व त्यातील सामान पूर्णपणे खाक झाल्याने दोन्ही कुटुंब उघड्यावर आले आहेत. या आगग्रस्त कुटुंबांना २५ किलो तांदूळ, पाच किलो दाळ, ३५ किलो मका, तेल व आवश्यक भांडी मोलगी ग्रामपंचायतीचे सरपंच मनोज तडवी, चंद्रसिंग वसावे, माजी पोलीस पाटील रतनसिग दवल्या वसावे, शाम सोलकी यांनी त्यांच्या घरी जाऊन मदत दिली.
सध्या लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही, त्यामुळे मजुरी नाही. अशा स्थितीत आग लागून संपुर्ण घरच खाक झाल्याने या कुटूंबांना उघड्यावर येण्याची वेळ आली.