लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असले तरी अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी संचारबंदीच्या कालावधीत देण्यात येणाऱ्या शिथिलतेचा काही नागरिकांकडून गैरफायदा घेतला जात असून यामुळे सोशल डिस्टन्स पाळण्याच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे. दरम्यान, मंगळवारी प्रेस मारुती मैदानावर भाजीपाला विक्रेत्यांसाठी जागेची आखणी करून विक्रेते व ग्राहकांनी नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.शहरात सकाळी आठ ते दुपारी बारा या कालावधीत अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी प्रशासनाने नागरिकांना सवलत दिली आहे. मात्र या सवलतीचा गैरफायदा घेण्याचे प्रकार वाढल्याने प्रशासन हतबल झाले आहे. अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसोबत बँकांमधून पैसे काढण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. विशेषत: सुरक्षित अंतर ठेवून एकावेळेस केवळ चार ग्राहकांना बँकेच्या आत प्रवेश देण्याचे निर्बंध प्रशासनाने घातले असले तरी बँक व्यवस्थापनाकडून याचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. बँकेत येणाºया ग्राहकाला सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी बंधनकारक न करता त्याला बँकेत व पतसंस्थांमध्ये प्रवेश दिला जात आहे. यामुळे बँकांमध्ये नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी सोशल डिस्टन्सिंग या मोहिमेला हरताळ फासण्याचे उद्योग सुरू आहेत.पालिका प्रशासनाने शहरात पाच ठिकाणी तात्पुरते भाजीपाला मार्केट सुरू केले असले तरी या सर्व ठिकाणी बेशिस्त कारभार सुरू आहे. दररोज सहजपणे भाजीपाला उपलब्ध होत असल्याने ताजा भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. नागरिकांची गर्दी होत असल्याने परिसराला या कालावधीत यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. विशेष म्हणजे भाजी विक्रेता व ग्राहक नागरिक या दोघांकडून शासकीय नियमांचे खुलेआम उल्लंघन होत आहे.सुुरुवातीला संचारबंदी व नंतर लॉकडाऊन कालावधी या काळात प्रशासनाच्या आवाहनाला जनतेची साथ लाभत असल्याने सीमावर्ती भाग असतानाही आपल्या तालुक्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. एवढा वेळ नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य केले आहे. जनतेने १४ एप्रिलपर्यंत काटेकोरपणे शासकीय नियमांचे पालन करावे. परिस्थिती नियंत्रणात असल्याबाबत जनतेला सूचित केले जाईल. मात्र लॉकडाऊनच्या या अखेरच्या आठवड्यात जनतेने गांभीर्याने नियमांचे पालन केले नाही तर भविष्यात याचे दुष्परिणाम सोसावे लागतील. यासाठी प्रशासनाच्यावतीने नागरिकांनी घरीच राहावे, असे आवाहन तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे.सर्व भाजी, फळे विक्रेत्यांनी शहादा येथील स्टेट बँकेच्या शाखेजवळ भरणारा बाजार हे ८ एप्रिलपासून सकाळी सात ते दुपारी १२ यावेळेत प्रेस मारुती मैदान येथे आखणी केल्यानुसार बसण्याचे करावे. तसेच एकावेळेस एकच व्यक्ती आपल्यासमोर राहील याची दक्षता घ्यावी. आपल्या दुकानासमोर एकावेळेस एकापेक्षा अधिक व्यक्तींशी व्यवहार करताना आढळून आल्यास सक्तीची कारवाई करण्यात येईल, याची सर्व विक्रेत्यांनी यांची नोंद घ्यावी.-राहुल वाघ,मुख्याधिकारी, शहादा नगरपालिका.
शहाद्यात नागरिकांकडून ‘सोशल डिस्टन्सिंग’ला हरताळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 12:56 PM