लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शेतात परिपक्व झालेली केळी, पपई, टरबूज ही पिके खराब होत आहेत. हा माल खरेदीसाठी व्यापारीही येत नसल्याने मातीमोल भावात विकावे लागत आहे. प्रकाशा येथील शेतकरी भरत दशरथ पाटील यांनी त्यांच्या शेतात पिकवलेली सुमारे तीन ट्रॉली केळीचे घड गावातच मोफत वाटप करीत आहेत.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार बंद आहेत. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून केळी, पपई, टरबूज या नाशवंत पिकांचे जास्त नुकसान होत आहे. या पिकांच्या खरेदीसाठी व्यापारीही येत नसल्याने मातीमोल भावात ती शेतकऱ्यांना विक्री करावी लागत आहेत. प्रकाशा येथील शेतकरी भरत दशरथ पाटील यांनी आपल्या सात एकर क्षेत्रामध्ये केळीची लागवड केली आहे. त्यांच्या शेतातील केळी निघत असून लॉकडाऊन होण्यापूर्वी काही केळी त्यांनी विक्री केली. मात्र सद्यस्थितीत सर्व केळी शेतातच पडून आहे. केळी खराब होत असल्याने त्यांनी तीन माणसे रोजंदारीने लावून ट्रॅक्टर ट्रॉलीत भरुन गावात मोफत वाटप करीत आहेत.पपई व टरबूजचीही अशीच परिस्थिती असून अत्यंत कमी भावात त्यांची मागणी होत असल्याने या पिकांवर केलेला खर्च निघणेही मुश्कील झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, दादर या पिकांची काढणी करून हा शेतमाल घरात पडून आहे. बाजार समितींचे व्यवहार बंद असल्याने शेतकºयांना शेतमाल विक्री करता येत नसल्याने त्यांच्यापुढे मोठे आर्थिक संकट उभे आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून शासनाने शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
मी सात एकर क्षेत्रामध्ये केळी लावली आहे. एक महिन्यापूर्वी १३०० रुपये दराने २० टन माल विकला. सद्यस्थितीत खरेदीसाठी व्यापारी येत नसून जे येतात ते चक्क २५० ते ३०० रुपये प्रती टन दराने मागणी होत आहे. म्हणून मी गावातच मोफत केळीचे घड वाटप करण्याचा निर्णय घेऊन माणसे लावून ते वाटप करीत आहे. शासनाने यावेळी शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.-भरत दशरथ पाटील,शेतकरी, प्रकाशा, ता.शहादा