लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : महाराष्ट्र औद्योगीक विकास मंडळाच्या येथील वसाहतीत कामगार असलेल्या ओरीसा राज्यातील ४५ कुटुंबांना नवापूर पोलीस व नोटरी वकील यांच्याकडून जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.कोरोनामुळे अंमलात येत असलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य व गोरगरीब जनतेस सोसावा लागत असल्याने त्यांच्यासाठी मदतीचा ओघही वाढत आहे. नवापूर पोलिसांनीही सामाजिक जबाबदारीचे भान ठेऊन शहरालगत असलेल्या औद्योगीक वसाहतीत ओरीसा राज्यातील कामगार आहेत. त्यापैकी ४५ कुटुंब असे आहे की जेथे काम मिळेल तेथे काम करत असल्याने त्यांची जबाबदारी कोणत्याही कंपनीने घेतली नाही. ही बाब लक्षात आल्यावर पोलीस विभागातर्फे ३५ कुटुंबियांना तांदूळ, डाळ व इतर साहित्य वाटप करण्यात आले व नोटरी अॅड.अनिल शर्मा यांनी १० कुटुंबांना साहित्य वाटप केले.पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, अॅड.अनिल शर्मा, ईश्वर पाटील व पोलीस कर्मचारी प्रविण मोरे, कृष्णा पवार, आदिनाथ गोसावी, निजाम पाडवी, प्रशांत यादव, भिमराव बहिरम, जगदीश सोनवणे, दिनेश बाविस्कर, प्रमोद पाटील व सहकारी कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. लॉकडाऊनमुळे रोज कमावून रोज खाणारे परिवार कमालीचे बाधीत झाले आहे. या काळात गरीबांचे मोठे हाल होत आहे. अश्या कामगारांना सामाजिक स्तरावर मदतीचा ओघ सुरू झाला आहे. राजकीय, अध्यात्मिक व सामाजिक संघटना याकामी सरसावल्या आहेत.शहरातील क्षत्रिय महाराणा प्रताप राजपूत समाज मंडळाकडून गरजू समाज बांधवांना धान्य व इतर संसारोपयोगी किराणा माल सामानाचे वाटप करण्यात आले. समाजातील युवकांनी गरीब व गरजू असे ३० घरांचा शोध घेतला. समाजातील प्रमुखांनी एकत्र येत सर्व ३० समाजबांधवांना संसारोपयोगी किराणा मालाची किट वाटप केली. ज्या ज्या समाजबांधवांना मदत करण्यात आली त्यांचे नाव व फोटो प्रकाशित न करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. या उपक्रमाचे समाजातुन स्वागत करण्यात आले.
ओरीसातील ४५ कामगारांना नवापुरात पोलिसांतर्फे सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 12:51 PM