मराठी भाषेवरून विनाकारण गैरसमज पसरवू नका; परिवहन विभागाच्या भूमिकेचे उदय सामंतांकडून समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 12:06 IST2026-04-27T12:03:31+5:302026-04-27T12:06:16+5:30
"महाराष्ट्रात राहतो तर मराठी आलीच पाहिजे!" भाषवेरून होणाऱ्या राजकारणावर उद्योगमंत्री उदय सामंत कडाडले.

मराठी भाषेवरून विनाकारण गैरसमज पसरवू नका; परिवहन विभागाच्या भूमिकेचे उदय सामंतांकडून समर्थन
नांदेड:मराठी भाषेच्या मुद्द्यावरून काही लोक विनाकारण राजकारण करत असल्याची टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. रविवारी हदगाव येथे शिवसेना (शिंदे गट) आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यासाठी ते आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, परिवहन विभाग किंवा शिवसेनेची भूमिका कोणावरही सक्ती करण्याची नसून, केवळ मराठी शिकावे हा त्यामागचा शुद्ध उद्देश आहे.
"शिकवायला आम्ही सज्ज!"
रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलता यावे, ही परिवहन मंत्र्यांची भूमिका योग्यच असल्याचे सांगत सामंत म्हणाले की, "आम्ही त्यांना स्वतःहून शिका असे म्हणत नाही, तर आम्ही त्यांना शिकवायला तयार आहोत. राज्याचे जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक यांनाही मराठीचा पेपर द्यावा लागतो, मग इतरांना मराठी येण्यात वावगे काय?" महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी भाषा येणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
चव्हाणांच्या हेलिकॉप्टर कारखान्यावर 'टोला'
नांदेडमध्ये ४ हजार कोटींचा हेलिकॉप्टर सुटे भाग तयार करण्याचा कारखाना होणार असल्याची माहिती खासदार अशोक चव्हाण यांनी दिली होती. यावर विचारले असता सामंत यांनी मिश्किलपणे टोला लगावला. "हा कारखाना कुठे आणि केव्हा होणार, याची मला माहिती घ्यावी लागेल. आताच आमदार हेमंत पाटील यांनी मला हे सांगितले, पुढच्या दौऱ्यात यावर सविस्तर बोलतो," असे म्हणत त्यांनी चव्हाणांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.