ट्रीपल आयटीच्या विद्यार्थ्याने जीवन संपवले; मोबाईल अनलॉक झाल्यानंतर कळणार कारण
By दयानंद पाईकराव | Updated: May 4, 2026 20:47 IST2026-05-04T20:44:59+5:302026-05-04T20:47:30+5:30
बुटीबोरी परिसरातील घटनेने खळबळ

ट्रीपल आयटीच्या विद्यार्थ्याने जीवन संपवले; मोबाईल अनलॉक झाल्यानंतर कळणार कारण
दयानंद पाईकराव, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन ॲंड टेक्नालॉजीच्या द्वितीय वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्याने सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास वसतीगृहाच्या चौथ्या माळ्यावरून आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे. दरम्यान आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचा मोबाईल ‘अनलॉक’ झाल्यानंतर त्याच्या आत्महत्येचे खरे कारण समजु शकणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
श्रेयस चंद्रकांत माने (२१) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मुळचा कोल्हापूर येथील रहिवासी असून तो नागपुरातील बुटीबोरी परिसरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन ॲंड टेक्नालॉजीच्या द्वितीय वर्षाला शिकत होता. मंगळवारी श्रेयसची सेमिस्टर परीक्षा सुरु होणार होती. तो वसतीगृहात राहत होता. त्याच्या खोलीत एकूण ४ विद्यार्थी राहत होते. परंतु श्रेयस मागील काही दिवसांपासून खोलीतील मित्रांशी देखील काही बोलत नव्हता. अभ्यास झाला नसल्यामुळे तो तणावात होता, अशी माहिती त्याच्या खोलीतील विद्यार्थ्यांनी पोलिसांना दिल्याची माहिती आहे.
सोमवारी पहाटे ४ वाजेनंतर तो खोलीच्या बाहेर निघाला आणि चौथ्या माळ्यावरून त्याने उडी घेतली. यात गंभीर जखमी झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान काही वेळानंतर ही घटना उघडकीस आल्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने बुटीबोरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. बुटीबोरी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी श्वानपथक, ठसे तज्ज्ञ व न्याय वैद्यक विभागाला पाचारण करून घटनास्थळाचा पंचनामा केला. घटनेची माहिती संबंधीत विद्यार्थ्याच्या मामाला कळविण्यात आली. त्यानंतर श्रेयसचे वडिल व आई तातडीने कोल्हापूरवरून नागपूरकडे रवाना झाले. या प्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे.
मोबाईल अनलॉक झाल्यानंतर कळु शकेल कारण
श्रेयसने चौथ्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. परंतु त्याने नेमक्या कोणत्या कारणावरून आत्महत्या केली, हे मात्र अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही. याबाबत नागपूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक अनिल म्हस्के यांना विचारना केली असता श्रेयसचा मोबाईल अनलॉक झाल्यानंतर आत्महत्येचे कारण समजु शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.