अंधश्रद्धेला सरकारकडूनच खतपाणी, खरात हे त्याचेच पाप : प्रा. श्याम मानव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 23:54 IST2026-04-24T23:50:21+5:302026-04-24T23:54:18+5:30
जादूटोणा विरोधी कायदा प्रभावीपणे राबविण्याची गरज

अंधश्रद्धेला सरकारकडूनच खतपाणी, खरात हे त्याचेच पाप : प्रा. श्याम मानव
नागपूर : राज्यात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आहे. परंतु त्याची अंमलबजावणीच नाही. सरकारच अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत. सत्तेत असलेले लोकचं अंधश्रद्धा पसरवणाऱ्या बाबांना गावोगावी फिरवत आहेत. खरात सारखे बाबा हे सरकारचेच पाप आहे असा आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक राष्ट्रीय संघटक प्रा. श्याम मानव यांनी येथे केला.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि विविध सामाजिक संघटनांच्यावतीने शुक्रवारी झांशी राणी चौक सीताबर्डी येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलन येथे प्रा. श्याम मानव यांचे जाहीर व्याख्यान पार पडले. ‘बुवा तेथे बाया आणि खरात सारख्या बाबाला स्त्रिया का फसतात ? या विषयावर त्यांनी विवेचन केले. उद्घाटक कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. विजय वडेट्टीवार होते. माजी आमदार अशोक धवड, जनमंचचे सल्लागार शरद पाटील प्रमुख अतिथी होते. प्रा. हरीश देशमुख, छायाताई सावरकर व्यासपीठावर होते.
यावेळी प्रा. श्याम मानव यांनी सुंदरदास महाराजापासून तर आसाराम व राम रहीमपर्यंत आणि नित्यानंद स्वामीपासून खरातपर्यंच्या ढोंगी बाबांचा आढावा घेतला. या सर्व बाबांनी महिलांचे शाेषण केले आहे. यात कुणीही अपवाद नाही. मोक्ष मिळवून देतो. आपल्यात दैवी शक्ती आहे. मी अवतारी पुरुष आहे. तुझ्या कुटुंबाला लाभ मिळवून देईल, असे आमीष दाखवून किंवा भिती दाखवून महिलांचे शोषण केले जाते. महिला या शोषणाला बळी पडतात. परंतु यात महिलांचा कुठलाही दोष नाही. तर आपण त्यांच्यावर लहानपणापासून केलेले संस्कार जबाबदार आहेत. महिलांना आपण लहानपणापासून तर्क करू नये असे सांगितले. तपश्चर्येने दैवी शक्ती प्राप्त करता येते. त्यासाठी एखादा गुरू असावा. गुरूवर पूर्ण श्रद्धा ठेवावी,त्याचा शब्द प्रमाण मानावा, हे आपणच महिलांना शिकवलेले असते. भोंदू बाबा लोकं याचाच फायदा घेतात.
खरातसारख्या बाबांनी हिंदू स्त्रियांचेच शाेषण केले. मग या शोषणापासून वाचवण्यासाठी प्रयत्न का होत नाही? या सरकारने आतातरी जागे होण्याची गरज आहे. राज्यात जादूटोणा विरोधी कायदा प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे, अन्यथा पुन्हा खरातसारखे बाबा निर्माण होतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. विजय वडेट्टीवार यांनी भोंदू बाबांचा ताडोबातील बांबूने उपचार करावा, असे सांगितले. शरद पाटील यांनीही आपले विचार मांडले. प्रास्ताविक सुरेश झुरमुरे यांनी केले. संचालन प्रशांत सपाटे यांनी केले.