आता नागपूर विमानतळ खऱ्या अर्थाने होणार मल्टीमॉडेल पॅसेंजर व कार्गो हब
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 12:41 IST2026-05-14T12:40:36+5:302026-05-14T12:41:33+5:30
विमानतळ 'जीएमआर'ला हस्तांतरित होणार : ४ हजार मीटर लांबीची नवीन धावपट्टी : आठ वर्षात पूर्ण होणार प्रकल्प

Now Nagpur Airport will truly become a multimodal passenger and cargo hub
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या जमिनीच्या वाढीव कालावधीच्या भाडेपट्टयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यामुळे ३० वर्षासाठी जीएमआर समूहाकडे विमानतळाचे संचालन व विकासाचे हक्क सोपवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २६०० एकरांतील ७,६०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पांतर्गत दोन टप्प्यांत नवीन टर्मिनल आणि नवी धावपट्टी उभारली जाणार आहे. आता नागपूर विमानतळ खऱ्या अर्थाने होणार मल्टीमॉडेल पॅसेंजर व कार्गो हब होणार आहे.
नागपूर विमानतळाचे जीएमआर समूहाकडे हस्तांतरण तातडीने होणार असून, संपूर्ण विकास एकूण ८ वर्षाच्या कालावधीत दोन प्रमुख टप्प्यांत पूर्ण केला जाईल. पहिल्या टप्प्यातील विकासकामांमध्ये सध्याच्या ३२०० मीटर लांबीच्या धावपट्टीला समांतर ४ हजार मीटर लांब आणि ६० मीटर रुंद दुसरी धावपट्टी उभारण्यात येईल. सोबतच आंतरराष्ट्रीय दर्जाचे कार्गो टर्मिनल तसेच प्रवासी सुविधा उभ्या राहतील. विमानतळावरील नवीन एकात्मिक टर्मिनलमध्ये प्रवाशांची वार्षिक क्षमता ४ कोटी गृहित धरण्यात आली आहे. शिवणगाव येथे ७५ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाची नवी टर्मिनल इमारत बांधली जाणार आहे. टॅक्सी-वे, अॅप्रोच रोड, पार्किंग आणि प्रवाशांना आवश्यक सोयीसुविधा यामध्ये उपलब्ध असतील.
२० हजार मेट्रिक टन क्षमतेचे कार्गो टर्मिनल
विमानतळावर सद्यस्थितीत १७विमाने उभी राहू शकतात. पुढील चार वर्षात आणखी १६ प्रवासी व दोन कार्गो विमाने उभी राहू शकतील. मालवाहतुकीला चालना देण्यासाठी २० हजार मेट्रिक टन क्षमतेचे कार्गो टर्मिनल उभारण्यात येईल.
पायाभूत सुविधांमध्ये सुधारणांसह नवीन प्रवेश रस्ते, एअरसाइड सुविधा, पार्किंग, हॉटेल्स आणि अन्य आनुषंगिक सुविधा राहतील. वाढीव संख्येतील विमानांचे नियमन व संचलनासाठी नवीन एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) टॉवर उभारण्यात येईल.
"मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याने नागपूर विमानतळ आता खऱ्या अर्थाने मल्टीमॉडेल पॅसेंजर व कार्गो हब होणार आहे. यासाठी राज्य शासन व प्रशासनाच्यावतीने अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. अखेर हे प्रयत्न फळाला आले. याचे संपूर्ण श्रेय हे मुख्यमंत्री फडणवीस यांनाच आहे. त्यांनी यासाठी दिल्लीस्तरावर बराच पाठपुरावा केला."
- डॉ. विपीन डटनकर, मनपा आयक्त नागपर