बारावीच्या निकालात नागपूर विभागाचा टक्का घसरला; यंदाही शेवटून दुसरा
By निशांत वानखेडे | Updated: May 2, 2026 15:46 IST2026-05-02T15:42:43+5:302026-05-02T15:46:30+5:30
२ टक्क्याची घसरण, यंदाही शेवटून दुसरा : मुलांपेक्षा मुलीच सरस, ८ टक्के अधिक पास

Nagpur division's percentage drops in 12th result; second from last this year too
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शनिवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात यंदाही नागपूर विभागाची कामगिरी निराशाजनक ठरली. परीक्षेत नागपूर विभागातून ८८.६७ टक्के विद्यार्थी यशस्वी ठरले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २ टक्क्यांची घट झाली आहे. यावर्षीसुद्धा विभाग शेवटून दुसऱ्या म्हणजे ८ व्या स्थानी कायम आहे. विशेष म्हणजे नागपूरच्या तुलनेत अमरावती विभागाने उत्तीर्णांचे ९०.९२ टक्के यश प्राप्त करीत तिसऱ्या स्थानी झेप घेतली. काेकण प्रथम व पुणे द्वितीय स्थानी आहे.
नागपूर विभागातून फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या बारावी बाेर्डाच्या परीक्षेस ७६,७५३ मुले आणि ७५,४७७ मुली मिळून एकूण १,५२,२३० विद्यार्थी प्रविष्ट झाले हाेते. यामधून १,३४,९८८ म्हणजे ८८.६७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नेहमीप्रमाणे यावर्षीही मुलींनीच निकालात सरशी घेतली आहे. ७५,४७७ पैकी ६९,८२१ मुली बारावीत उत्तीर्ण झाल्या. परीक्षेत बसलेल्या ७६,७५३ मुलांपैेकी ६५,१६७ मुले उततीर्ण झाले. ९२.५० टक्के मुली आणि ८४.९० टक्के मुलांनी यश मिळाविले असून मुलांपैक्षा मुलींचा निकाल ८ टक्क्याने अधिक आहे.
विभागात नागपूर जिल्हा अव्वल
निकालात नागपूर विभागाचा टक्के घसरला पण नागपूर जिल्हा यंदा अव्वल ठरला आहे. नागपूर जिल्ह्यातून ६२,८६४ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले हाेते, त्यापैकी ५७,६२२ विद्यार्थी म्हणजे ९१.६६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
जिल्हा एकूण प्रविष्ट एकूण उत्तीर्ण मुले मुली टक्के
नागपूर - ६२,८६४ - ५७,६२२ - २७,९७७ - २९६४५ - ९१.६६
गाेंदिया - १८,०६३ - १६,१८४ - ८०३४ - ८१५० - ८९.५९
चंद्रपूर - २६,७५७ - २३,७३९ - ११,३९१ - १२,३४८ - ८८.७२
वर्धा - १५,५२१ - १३,५८५ - ६५३३ - ७०५२ - ८७.५२
भंडारा - १६,५५५ - १३,९२७ - ६५७६ - ७३५१ - ८४.१२
गडचिराेली - १२,५७० - ९९३१ - ४६५६ - ५२७५ - ७९.६३
गुणपडताळणी, छायाप्रतीसाठी १५ मे पर्यंत करा अर्ज
ज्या विद्यार्थ्यांना निकालाबद्दल आक्षेप असेल किंवा मिळालेल्या गुणाबद्दल असमाधान असेल, त्यांनी पुन्हा गुणपडताळणीसाठी राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर ३ मे ते १७ मे २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. प्रति विषय ५० रुपये ऑनलाईन शुल्क भरावे लागेल. याशिवाय उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती मागविण्यासाठी विद्यार्थी मंडळाचे संकेतस्थळावर किंवा ई-मेलद्वारे ३ मे ते १७ मे २०२६ या कलावधीत अर्ज करू शकतात. यासाठी प्रति विषय ४०० रुपये शुल्क ऑनलाईन जमा करावे लागेल.