वाढते बिबटे, आक्रसते जंगल; संघर्ष की सहजीवनाचा मार्ग ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 14:32 IST2026-05-04T14:31:17+5:302026-05-04T14:32:16+5:30
Nagpur : महाराष्ट्रात बिबट्यांची संख्या सातत्याने वाढत असली तरी त्यांच्या संवर्धनासमोरील आव्हाने अधिक गुंतागुंतीची बनत आहेत. वाढते नागरीकरण, शेतीचा विस्तार आणि जंगलांचे आक्रसत जाणारे क्षेत्र यामुळे बिबट्यांचे पारंपरिक अधिवास कमी होत आहेत.

Increasing leopard population, encroaching forests; conflict or path to coexistence?
गणेश वासनिक
नागपूर : महाराष्ट्रात बिबट्यांची संख्या सातत्याने वाढत असली तरी त्यांच्या संवर्धनासमोरील आव्हाने अधिक गुंतागुंतीची बनत आहेत. वाढते नागरीकरण, शेतीचा विस्तार आणि जंगलांचे आक्रसत जाणारे क्षेत्र यामुळे बिबट्यांचे पारंपरिक अधिवास कमी होत आहेत.
परिणामी, अन्न आणि पाण्याच्या शोधात बिबट्यांचा मानवी वस्त्यांकडे वावर वाढत असून मानव-बिबट संघर्ष तीव्र होत आहे. दरवर्षी राज्यात १८० ते २०० बिबट्यांचा मृत्यू होत असून त्यातील बहुसंख्य मृत्यू रस्ते अपघात, उघड्या विहिरीत पडणे, विजेचा धक्का लागणे यांसारख्या टाळता येण्याजोग्या कारणांमुळे होतात. तज्ज्ञांच्या मते, बिबट्यांना पकडून स्थलांतरित करणे हा दीर्घकालीन उपाय नाही; कारण रिकाम्या अधिवासात दुसरा बिबट्या येण्याची शक्यता कायम राहते. त्याऐवजी गावालगतचे झुडपी जंगल, नैसर्गिक पाणीस्रोत आणि शिकार प्रजातींचे संवर्धन, उघड्या विहिरींना संरक्षण, तसेच स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढविणे यांसारख्या उपाययोजनांमुळे सहजीवनाची संकल्पना प्रभावी ठरू शकते. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, बिबट संवर्धनासाठी अधिवास जतन आणि लोकजागृती हाच शाश्वत पर्याय आहे.
स्थानिक पातळीवरील संवर्धनासाठी उपाययोजना
- विहिरींचे जाळीकरण : ग्रामीण भागातील उघड्या विहिरी बिबट्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत. संरक्षक भिंती किंवा जाळ्या बसविणे आवश्यक आहे.
- अधिवास पुनर्संचयित करणे: गावालगतची झुडपी जंगले व नैसर्गिक पाणीस्रोत जतन केल्यास बिबट्यांचा गावांकडे वावर कमी होऊ शकतो.
- कचरा व्यवस्थापन : मानवी वस्त्यांतील कचऱ्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढते. कुत्र्यांच्या शिकारीसाठी बिबट्यांचा वस्तीत प्रवेश वाढतो. त्यामुळे स्वच्छता अत्यावश्यक आहे.
- लोकसहभाग वाढविणे: स्थानिक युवकांना 'वन्यजीव रक्षक' म्हणून प्रशिक्षित करून आपत्कालीन परिस्थितीत तत्पर मदत यंत्रणा उभारणे गरजेचे आहे.
"बिबट्याला पकडून दुसरीकडे हलविल्यास त्या रिकाम्या अधिवासात दुसरा बिबट्या येण्याची शक्यता असते. शिवाय, ट्रान्सलोकेशनमुळे बिबट्या अधिक आक्रमक होऊ शकतो. बिबट्यांच्या अधिवासात कृत्रिम पाणवठे निर्माण करणे, चितळ-हरीण यांसारख्या खाद्यसाखळीतील प्राण्यांची संख्या वाढविणे, तसेच संरक्षित वनक्षेत्रात मानवी हस्तक्षेप कमी करणे या उपाययोजनांमुळे सहजीवन शक्य होऊ शकते. हाच शाश्वत मार्ग आहे."
- यादव तरटे पाटील, माजी सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ