"खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 11:45 IST2026-04-28T11:41:57+5:302026-04-28T11:45:18+5:30
Anil Deshmukh : सोयाबीनला भाव नसल्याने बळीराजा हवालदिल झाला असतानाच, आता खतांच्या किमतीत २५ ते ४५ टक्क्यांपर्यंत भरमसाठ वाढ करून सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम केले आहे अशा शब्दांत अनिल देशमुख यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

"खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक
नागपूर - राज्यातील शेतकरी सध्या अस्मानी आणि सुल्तानी संकटात सापडला आहे. सोयाबीनला भाव नसल्याने बळीराजा हवालदिल झाला असतानाच, आता खतांच्या किमतीत २५ ते ४५ टक्क्यांपर्यंत भरमसाठ वाढ करून सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम केले आहे अशा शब्दांत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी खत दरवाढ, ऑटो चालकांना मराठी सक्ती आणि बच्चू कडू यांच्या पक्ष विलीनीकरणाच्या चर्चेवर आपली स्पष्ट भूमिका मांडली.
"बळीराजाची लूट थांबवा, कारखानदारांना लगाम घाला"
खतांच्या वाढलेल्या किमतींवर भाष्य करताना अनिल देशमुख म्हणाले की, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने वाढीव किमती त्वरित कमी कराव्यात किंवा थेट सबसिडी जाहीर करावी. यावेळी त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की, खत टंचाई किंवा दरवाढीसाठी कृषी केंद्र चालकांना दोषी धरून त्यांच्यावर कारवाई केली जाते, मात्र मूळ दोषी हे कारखानदार आहेत. त्यामुळे कृषी केंद्रांवर नाहक कारवाई न करता, खतांचे उत्पादन करणाऱ्या कारखानदारांवर सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
"महाराष्ट्रात राहता तर मराठी आलीच पाहिजे!"
ऑटो आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेच्या सक्तीबाबत विचारले असता देशमुख यांनी ठाम भूमिका घेतली. "महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला इथली भाषा किमान बोलता आलीच पाहिजे. १ मे पासून हा नियम लागू होणार होता, मात्र तो आता पुढे ढकलण्यात आला आहे. ऑटो किंवा टॅक्सी चालकांना काही मराठीत निबंध लिहायचा नाहीये, पण किमान ८-१० वाक्ये किंवा अर्धे शब्द तरी त्यांना मराठीत बोलता यायला हवेत. मराठी भाषेचा आदर राखणे आणि ती शिकणे यात कोणतीही अडचण असू नये," असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रहार संघटनेचे विलीनीकरण करण्याच्या चर्चेवर बोलताना त्यांनी सांगितले की, बच्चू कडू हे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जमिनीवर काम करत आहेत. त्यांना सल्ला देण्याची गरज नाही. ते आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या हिताचा योग्य तो निर्णय घेण्यास सक्षम आहेत. तसेच, सायबर पोलीस पथकातील वादाच्या प्रकरणावर त्यांनी सध्या भाष्य करणे टाळले असून, पूर्ण माहिती घेऊन सविस्तर बोलणार असल्याचे सांगितले.