पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 13:53 IST2026-04-28T13:48:25+5:302026-04-28T13:53:38+5:30
International News: मध्य आफ्रिकेतील वाळवंटी प्रदेशात असलेल्या चाड या देशात पाण्यावरून सुरू झालेल्या किरकोळ वादाचं पर्यावसान भीषण संघर्षात होऊन त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे.

पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू
वाढत्या उन्हाळ्याबरोबर आपल्या देशातील विविध भागात आता पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. दरम्यान, तिकडे मध्य आफ्रिकेतील वाळवंटी प्रदेशात असलेल्या चाड या देशात पाण्यावरून सुरू झालेल्या किरकोळ वादाचं पर्यावसान भीषण संघर्षात होऊन त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. दोन कुटुंबामध्ये सुरू झालेली ही लढाई बघता आजूबाजूच्या परिसरात पोहोचली. त्यानंतर परिस्थिती एवढी चिघळली की ज्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सैन्याला पाचारण करावं लागलं. या संघर्षात आतापर्यंत ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० जण जखमी झाले आहेत.
हा संघर्ष चाड देशातील वादी फिरा प्रांतात असलेल्या इगोते गावात सुरू झाला. या संघर्षाची सुरुवात पाण्याच्या विहिरीवरून झाली. बघता बघता या किरकोळ वादाचं लोण आजूबाजूच्या समुदायांपर्यंत पोहोचलं. तसेच दोन्हीकडून बदल्याची कारवाई सुरू झाली. जाळपोळ केली गेली. त्यात अनेक लोक मारले गेले. परिस्थिती एवढी बिघडली की, चाड सरकारला येथे सैन्याला पाचारण करावे लागले.
परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी देशाचे उपपंतप्रधान लिमाने महामत स्वत: घटनास्थळी पोहोचले. तसेच आता येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या संघर्षात ४२ जणांच्या झालेल्या मृत्युमुळे पाणी हा चाडमध्ये किती मोठा मुद्दा बनला आहे हे प्रकर्षाने समोर आले आहे.