१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 14:38 IST2026-04-28T14:22:20+5:302026-04-28T14:38:33+5:30
Transport Minister Pratap Sarnaik: राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे सक्तीचे करण्याच्या निर्णयावरून गेल्या काही दिवसांपासून मोठा ...

१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
Transport Minister Pratap Sarnaik: राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे सक्तीचे करण्याच्या निर्णयावरून गेल्या काही दिवसांपासून मोठा वादंग सुरू होता. मात्र, आता या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. परिवहन विभागाने एक पाऊल मागे घेत रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबईसह राज्यातील रिक्षाचालकांसाठी १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला . मात्र, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या आरटीओ अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय बैठकीत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय झाला. आता १ मे ते १५ ऑगस्ट या कालावधीत रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी दिली जाणार असून, आरटीओ अधिकारी स्वतः यासाठी पुढाकार घेणार आहेत.
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी बोलणे बंधनकारक
"रिक्षा टॅक्सी संघटनांनी मुदतवाढीची मागणी केली होती. पण आमच्याकडे जी माहिती आली त्यानुसार रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी २०२० साठी एक पुस्तिका देखील काढली होती. रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी बोलणे बंधनकारक आहे. कारण ती आपली राजभाषा आहे आणि त्याचा आदर करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. राज्यातील सर्व आरटीओंना मी सांगितले आहे की एक मे पासून आमची मोहीम चालू सुरु करणार आहोत आणि राज्यात ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने रिक्षा टॅक्सी चालत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे," असा इशारा मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.
आरटीओ अधिकारी होणार 'शिक्षक'
"मराठी भाषेसाठी १ मे पासून आम्ही कारवाई करणार नाही, पण आमची मोहीम सुरू ठेवणार आहोत. १ मे ते १५ ऑगस्ट राज्यातील सर्व आरटीओंनी एक समिती निर्माण करायची आणि त्यातून जे नियम पाळत नाहीत आणि मराठी भाषा बोलत नाहीत, चुकीच्या पद्धतीने गाड्या चालवत असतील नियम भंग करत असतील त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार बेकायदेशीर पद्धतीने गाडी चालवून प्रवाशांना त्रास देत असतील तर त्यांचे लायसन्स रद्द करण्याचा अधिकार परिवहन विभागाला आहे," असेही प्रताप सरनाईक म्हणाले.
"ज्यांची मराठी भाषा शिकायची तयारी आहे त्यांना आरटीओ कार्यालयात जागा तयार करून देण्याचे आदेश दिले आहेत. कायदेशीर कारवाई आम्ही करणारच आहोत पण १ मे ते १५ ऑगस्ट आमचे आरटीओचे अधिकारी त्यांना मराठी शिकवतील त्यादरम्यान त्यांनी मराठी शिकायला हवं. तसेच मराठी भाषेसाठी परवाना रद्द होणार नाही, मात्र चालकाने काही बेकायदेशीर कृत्य केलं तर त्यावर कारवाई केली जाईल. तुम्ही मराठी भाषा शिकायला तयार आहात तर आमचे आरटीओचे अधिकारी तुम्हाला शिकवायला तयार आहेत. शिकण्यासाठी आम्ही वेळ द्यायला तयार आहोत. आमच्या आरटीओचे अधिकारी तुम्हाला मराठी भाषेत शिकवतील. पण महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर मराठी यायलाच हवी," असंही सरनाईक यांनी सांगितले.
"हिंदी भाषिकांनी आमच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. त्यामुळे त्यांना संधी देणे आमचे कर्तव्य आहे. ही शंभर दिवसांची मोहीम असून यातूनही ते मराठी बोलायला शिकले नाहीत तर आम्ही ठरवू. कोणी कितीही दबाव टाकला, कोणी कितीही बंदचे हत्यार उपसले तरी महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असला तर मराठी शिकावी लागेल. आम्ही शिकवायला तयार आहोत त्यामुळे शिकून घ्या," असा सल्ला सरनाईक यांनी दिला.